कोल्हापूर : सात हजारच्या लाचेसाठी आलास, बुबनाळ गावच्या तलाठ्याला अटक
जमिनीच्या सातबारावरील बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करुन नवीन सातबारा काढून देण्यासाठी तलाठ्याने सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आलास व बुबनाळ (ता. शिरोळ) गावचे तलाठी गजानन आप्पासो माळी (वय 46) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून इंचलकरंजी येथे अटक केली. या कारवाईमुळे शिरोळ महसुल क्षेत्रात खळबळ उडाली असून, पुरवठा व महसूल विभागातील काहींनी महत्वाचे काम, आजारी असल्याचे कारण सांगून घरीच थांबणे पसंत केले.
तक्रारदाराने आपली शेत जमीन गहाण ठेवून बँकेचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड झाल्यानंतर जमिनीच्या सातबारावरील कर्ज (रिकन्वेन्स) बोजा कमी करण्यासाठी तलाठी यांच्याकडे ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज दिला होता. वारंवार हेलपाटे मारून सुद्धा दखल घेतली नाही. शेवटी या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने माळी यांना बोजा कमी करण्यासाठी विनंती केली. परंतु तलाठ्यांनी आपल्या सातबारा वरून बोजा कमी करायचा असेल तर दहा हजार रुपये द्यावे लागतील अशी स्पष्ट मागणी केली. तडजोडी अंती सात हजार देण्याचा व्यवहार ठरला.
संबधीत तक्रारदाराने याप्रकरणी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, कृष्णात पाटील यांनी सापळा रचून माळी यांनी लाच मागितलेचे पुरावे निदर्शनास आनले. त्यानुसार तलाठी माळी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.