Bus Workers Movement : मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोमणा तर, एसटी कर्मचाऱ्यांना विनंती
मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाच्या (Bus Workers Movement) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलेले आहे. तसेच त्यांच्या आंदोलनाला प्रोत्साहन देणाऱ्या विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांनो (Bus Workers Movement) तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले, असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे असं म्हणतात की, “अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे”, अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी #एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन pic.twitter.com/6XffAqLWn5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 10, 2021
“राजकीय पक्षांनीदेखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या”, असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.