पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी | पुढारी

पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या सर्वत्र पावसाळ्याचे वातावरण आहे. या काळात विद्युत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी घरगुती व सार्वजनिक ठिकाणी वीजयंत्रणा व उपकरणांपासून सावध राहावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज दुर्घटना टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाकडून करण्यात आले आहे.

वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. तसेच विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अशी घ्यावी काळजी

पावसाळ्यात वीज उपकरणे हाताळताना पायात स्लीपर, चप्पल घालावी.

प्रत्येक वेळी वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

विद्युत खांबाला व तारांना जनावरे बांधू नयेत.

वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा.

तार तुटल्यास किंवा पोल पडल्यास तसेच बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास महावितरण कंपनीला कळवावे.

येथे साधावा संपर्क

अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा तक्रारी देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरू असणार्‍या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे ॲप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत मोबाइलवरून महावितरणच्या ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तक्रार नोंदविता येईल.

हेही वाचा : 

Back to top button