भाजपचा पराभव हा स्वभावाचा पराभव : राज ठाकरे | पुढारी

भाजपचा पराभव हा स्वभावाचा पराभव : राज ठाकरे

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकमधील भाजपचा पराभव हा स्वभावाचा पराभव आहे. वागणुकीचा पराभव आहे, आपलं कोण वाकडे करू शकत? असा जो विचार असतो त्याचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरू नये, कर्नाटकच्या निकालाने सर्वांनीच बोध घ्यावा, असा टोला राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लगावला.

रविवारी त्यांनी अंबरनाथ शहरातील रोटरी सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना कर्नाटकातील निकालाने सर्वच राजकीय पक्षांनी बोध घेण्याचे सुचवले. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातील कार्यशाळेबाबत बोलताना येत्या पाच जूनपासून ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये कार्यशाळा सुरू होतील. कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिले जातील. दिलेल्या गोष्टी कशा राबवतायेत, याबाबत आढावा
घेण्यात येईल, असे त्यांनी माहिती देताना सांगितले.

भारत जोडो यात्रेचादेखील मोठा परिणाम

महाराष्ट्रात बदलाचे वारे, यावर मात्र आत्ताच हे ठरवू नका. कर्नाटकात आताच निकाल लागला आहे. लगेच पुढे उडी मारू नका, असेही राज यांनी बोलताना सांगितले, तर भारत जोडो यात्रेचादेखील मोठा परिणाम असल्याचे कर्नाटकाच्या विजयाबद्दल ते बोलले. पक्षातील अंतर्गत गटबाजी बद्दल, या पुढे गटबाजी होणार नाही, असेही ते म्हणाले.

Back to top button