ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी सोमवारचा (दि.१३) दिवस मोठ्या हालअपेष्ठांचा ठरला. सकाळी ठाणे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने व सायंकाळी वादळी- वार्यामुळे यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवसभर लोकल खोळंबल्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. ठाणे स्थानकात सोमवारी (दि.१३) सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी झालेली असतांना ट्रेनमध्ये चढताना महिलांच्या डब्यात मोठी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली.
मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणार्या लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने सोमवारी (दि.१३) सकाळपासूनच ट्रेन अनिश्चित वेळापत्रकानुसार धावत होत्या. तर कल्याणहून मुंबईकडे जाणार्या अनेक लोकल ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने लोकलने प्रवास करणार्या चाकरमान्यांचे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल झाले. ठाणे येथे सिंगल तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उदभवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, ऐन पीकअव्हरमध्ये लोकल खोळंबल्याने सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे आदी स्थानकांसह इतर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. त्यानंतर सायंकाळी वादळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक ठप्प झाली. ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे उशीरा धावत असल्याने घरी जाण्यासाठी प्रवाशांची स्थानकावर तोफा गर्दी झाली. यावेळी महिलांच्या डब्यात गाडीत चढताना चेंगराचेंगरीची घटना घडली. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लेटफॅार्म नंबर पाचवर ही घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत रेल्वे स्थानकावरील गर्दी ओसरली नव्हती. रेल्वे गाड्या उशीरा धावत असल्याने व अनेक ट्रेन रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
हेही वाचा :