विराट कोहलीचा RCB संघ ‘असा’ पोहचणार प्लेऑफमध्ये, जाणून घ्या समीकरण | पुढारी

विराट कोहलीचा RCB संघ ‘असा’ पोहचणार प्लेऑफमध्ये, जाणून घ्या समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे एकूण 55 सामने खेळले गेले आहेत आणि लीग टप्प्यातील अजून 15 सामने खेळायचे आहेत. जिथे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या दोन स्थानांवर आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. म्हणजेच सात संघांमध्ये प्लेऑफच्या शेवटच्या दोन जागांसाठी चुरस असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आणि केकेआरच्या संघांनी ज्या प्रकारे जबरदस्त पुनरागमन केले आहे. ते पाहता शेवटच्या चार संघांच्या नावाचा अंदाज लावणे अद्याप सोपे नाही.

गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर आरसीबीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. संघाने 11 पैकी सहावा सामना गमावला. यानंतर विराटचा संघ प्लेऑफ गाठेल की नाही अशी धाकधुक चाहत्यांना लागून राहिली आहे. पण आरसीबीचा संघ अजूनही शेवटच्या 4 मध्ये स्थान मिळवू शकतो. त्याची अनेक समीकरणे आहेत, ज्यावर आपण या बातमीत सविस्तर चर्चा करू. त्याआधी, आरसीबीला आपले उर्वरित तीन सामने राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचे आहेत. म्हणजे प्रवास सोपा नाही पण अशक्यही नाही.

RCB अंतिम-4 मध्ये कसे पोहोचेल?

आरसीबीला प्रथम त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. सध्या हा संघ 11 पैकी पाच सामने जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. तर पंजाब, कोलकाता, राजस्थान आणि लखनौला समान गुण आहेत. अशा स्थितीत या चार संघांमध्ये निकराची लढत होऊ शकते. त्यासाठी आरसीबीला त्यांच्या उर्वरित एका सामन्यात राजस्थानला पराभूत करावे लागेल. त्यामुळे संजू सॅमसनच्या संघाच्या आशा संपुष्टात येऊ शकतात आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील हा संघ प्लेऑफसाठी मजबूत होऊ शकतो. याशिवाय, सनरायझर्सचाही पराभव करून, आरसीबी त्यांना स्पर्धेतून बाहेर काढून स्वतःचा मार्ग मजबूत करू शकतो. मग खरे आव्हान गुजरात टायटन्सचे असेल. जीटीला पराबवाचा सामना करावा लागला तरी फारसा फरक पडणार नाही पण तो सामना जिंकून आरसीबीला नक्कीच फायदा होऊ शकतो.

म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आता प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी पुढील सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. जर असे झाले तर त्यांच्या आशा पल्लवित होतील. राजस्थान आणि हैदराबादला मात देऊन आरसीबी पुढील दोन सामन्यांमध्ये स्वत:ला बळकट करू शकतो. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही त्यांना गुजरातवर मात करावी लागणार आहे. दुसरीकडे गुरुवारी राजस्थानचा सामना कोलकाताशी होणार आहे. येथे पराभूत होणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आपोआप कमकुवत होईल. त्यानंतर शुक्रवारी गुजरातला पराभूत करून आपले स्थान बळकट करण्याकडे मुंबईचे लक्ष असेल. सद्यस्थितीनुसार अंतिम चार संघांबाबत काहीही सांगणे घाईचे ठरेल. पण शेवटच्या टप्प्यात 16 गुणांवर नेट रनरेटचा खेळही स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

Back to top button