Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी राजीनामा दिल्यामुळे सीमावासीयांनाही धक्का
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सीमावासीयांनाही धक्का बसला आहे. शरद पवार नेहमीच सीमावासीयांसोबत राहिले आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नाबरोबरच देशातील प्रश्न सोडवण्यासाठी पवार यांची गरज आहे. त्यासाठी त्यांनी निवृत्तीच्या घोषणेचा फेरविचार करावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सीमावासियांच्या सर्व प्रश्नांची जाण असणारा नेता अशी पवार यांची ओळख आहे. शरद पवार केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, नव्हे तर संपूर्ण भारताचे नेते आहेत. सीमाप्रश्नाबरोबर देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची गरज आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेऊन ते आपल्या घोषणेचा फेरविचार करतील असा विश्वास आहे, असे पत्रात नमूद केले आहे.