Shahuwadi Murder Case : चहासाठी गेला आरवचा बळी, नेमका का चिडला राकेश? | पुढारी

Shahuwadi Murder Case : चहासाठी गेला आरवचा बळी, नेमका का चिडला राकेश?

सरूड : पुढारी वृत्तसेवा

वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील आरव केसरे या दुर्दैवी बालकाच्या हत्येचे गूढ उकलण्यात शाहूवाडी पोलिसांना बुधवारी सायंकाळी यश आले. मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद देणार्‍या जन्मदात्या पित्यानेच पोटच्या कोवळ्या आरवची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. राकेश रंगराव केसरे (वय २७, रा. कापशी, ता. शाहूवाडी) असे खुनी बापाचे नाव आहे. (Shahuwadi Murder Case)

Shahuwadi Murder Case : चहासाठी गेला आरवचा बळी

रविवारी सायंकाळी हॉटेलवर कामाला जाण्याआधी चहा पिण्याची राकेशला इच्छा झाली. यावेळी त्याने घराबाहेर गेलेली पत्नी साधनाला बोलावून आणण्यास आरवला सांगितले; मात्र त्यास आरवने नकार दिल्याने राग अनावर झालेल्या राकेशने आधी भिंतीवर आपटून, नंतर आरवच्या छातीवर जोराचा ठोसा मारला. यात आरव बेशुद्ध पडला.

यावेळी राकेशने भीतीपोटी आरवचा गळा दाबून खून केला आणि लगबगीने घरामागील पडक्या खोलीत मृतदेह दडवून ठेवला. संशय येऊ नये म्हणून त्याने आरव बेपत्ता झाल्याचा बनाव रचला आणि पोलिसांत फिर्याद देऊन निमूटपणे सरूड येथील हॉटेलवर कामावर गेला.

रागाच्या भरात गळा आवळला

रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या आरवचा राकेशने भीतीपोटी गळा आवळून जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम 302, 201 अन्वये हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दिवसभराच्या पोलिस तपासानंतरही बालकाच्या हत्येचे गूढ कायम होते.

तपास यंत्रणेने या संवेदनशीलप्रकरणी जवळच्या नातलगांसह जवळपास 12 ते 15 जणांची कसून चौकशी केली. यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत होती.

माहितीतील विसंगतीमुळे हा तपास ठोस निष्कर्षाप्रत पोहोचला नसल्याचे सांगत यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली होती.

मात्र, एकंदर पोलिसांच्या हालचालींवरून या निरागस बालकाच्या हत्येमागील सूत्रधार म्हणून जवळच्या नातलगांवरच संशयाची सुई स्थिरावल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते.

बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित राकेशला चौकशीच्या बहाण्याने स्थानिक तपास केंद्राच्या ठिकाणी बोलावून घेत ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी त्याची पत्नी साधना, सासू, सासरा तसेच अविवाहित मेव्हणी यांना बांबवडे पोलिस दूरक्षेत्रात हलविले आणि तत्काळ राकेश याला बोलते करत पोलिसांनी त्याच्याकडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

दरम्यान, राकेशनेच रात्रीच्या सुमारास आरवच्या मृतदेहावर हळद, कुंकू आणि गुलाल टाकून त्यास घराजवळच्या बोळात टाकल्याचे समोर आले आहे.

Shahuwadi Murder Case : पत्नीला संपवूनच पोलिसांत हजर राहण्याचा विचार

पत्नी साधना हिचाही काटा काढण्याचा राकेशने कट रचला होता. दोघांमध्ये असलेला बेबनाव हे त्यामागे कारण होते. परंतु, आरव बेपत्ता झाल्याच्या बातमीने घरात पै-पाहुणे, नातलगांची वर्दळ असल्याने त्याचा तो कट फसला.

यात पोलिसांनी चाणाक्षपणा दाखवत साधनाला जाणीवपूर्वक त्याच्यापासून दूर ठेवत तपास गतिमान करून राकेशच्या मुसक्या आवळल्या. पत्नीची हत्या करूनच आपण स्वतः पोलिसांत हजर राहणार होतो, असा कबुली जबाबही संशयित राकेशने पोलिसांना दिला आहे.

आरवच्या हत्येचे गूढ उकलण्यात दिरंगाई होत असल्याने कापशी गावात बुधवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.

जलदगतीने तपास करून संशयितांना जेरबंद करण्याच्या मागणीसाठी जमाव गोळा करू पाहणार्‍यांना डीवायएसपी साळुंखे आणि पोलिस निरीक्षक पाटील यांनी संयम बाळगण्याचे केलेले आवाहन सफल ठरले.

गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने संशयितांचे फोन कॉल तपशील तसेच सोशल मीडियावरील संभाषणात मिळणार्‍या माहितीनुसार गावातील काहीजणांना पोलिस चौकशीला सामोरे जावे लागत असताना दिवसभर अफवांचे पीक उठत राहिले.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आरवचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी वजनदार वस्तूचा घाव बसून छातीच्या दोन बरगड्या तुटलेल्या आढळून आल्या होत्या.

स्वतःचे कृत्य दडविण्यासाठी रचला नरबळीचा बनाव

जिल्हा पोलिसप्रमुखांसह वरिष्ठांशी संपर्क राखत अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कापशी गावात दिवसभर तळ ठोकला होता.

अंधश्रद्धेचा या हत्येशी दुरान्वये संबंध नसल्याचे सांगणार्‍या तपास यंत्रणेने गावातील देवऋषी तसेच गंडेदोर्‍यांशी निगडित घटकांना चौकशीसाठी दोन ते तीनवेळा पाचारण केल्याने घटनेतील संभ्रम वाढला होता.

दुसर्‍या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह काही पुरोगामी विचारांच्या संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच महसूल प्रशासनाला निवेदन सादर करून गुन्ह्याची उकल करण्याचा तगादा लावला होता.

अखेर फिर्यादी बापच निरपराध आरवचा मारेकरी निष्पन्न झाल्याने आणि त्यानेच नरबळीचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button