प्रश्न परदेशात जाणार्‍यांच्या सुरक्षिततेचा | पुढारी

प्रश्न परदेशात जाणार्‍यांच्या सुरक्षिततेचा

- हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

भारतामधून शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, इराण, इस्रायल आदी देशांमध्ये जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे, आपण विकासाचे गोडवे कितीही गात असलो, तरी शिक्षण-उच्चशिक्षण घेतलेल्यांना त्यांच्या पात्रतेनुसार, क्षमतेनुसार भारतात रोजगार मिळतोच, असे नाही. त्यामुळे अनेक भारतीय परदेशाची वाट धरतात. यासाठी अनेकजण बेकायदेशीर मार्गांचाही वापर करतात.

परदेशातील भारतीयांच्या अनेक समस्या असतात. नवा देश, परकी भाषा, वेगळे लोक, वेगळे कायदे, सामाजिक जीवनात शिस्त, आगळी जीवनशैली या गोष्टी भारतीयांना सतावतात. त्यातून मानसिक तणाव वाढतात. प्रत्येकाला तिथले हवामान किंवा अभ्यास पद्धती मानवतेच, असे नाही. याखेरीज आपली जन्मभूमी सोडून सातासमुद्रापार गेल्यानंतर काही चुकीच्या मार्गाला लागण्याची आणि त्यातून परदेशातील माहीत नसलेल्या कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता असते. तिथे पावलापावलावर असे अनेक धोके असतात. ते ओळखता आले पाहिजेत, विविध धोक्यांपासून स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी गेलेल्या भारतीयांच्या सुरक्षेविषयी एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेमध्ये अनेक विद्यार्थी आणि भारतीय नागरिक तेथील कायदा-सुव्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे मारले गेल्याचे समोर आले आहे. अमेरिका, कॅनडा, ग्रेट बि—टनमध्ये हिंदूंच्या मंदिरांवरही अनेक हल्ले झाले. रशियामध्ये काम करण्याकरिता गेलेल्या भारतीयांना रशियन सैन्यात भरती करून युक्रेन युद्धभूमीवर पाठवल्याचेही मध्यंतरी समोर आले आहे. याखेरीज अनेक भारतीय बेकायदेशीररीत्या अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नामध्ये मेक्सिको सीमेवर बळी पडले आहेत. मात्र, यादरम्यान एक सर्वात धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे कंबोडिया, लाओस आणि थायलंडमध्ये गेलेल्या अनेक भारतीयांना बंधक बनवून थायलंड आणि लाओसमध्ये बेकायदा कामे करण्यासाठी तेथील क्राईम सिंडिकेट भाग पाडत आहेत.

शिक्षणासाठी, नोकरी वा उद्योग-व्यवसायासाठी आणि कुंपणापलीकडचे सुंदर जग जगण्यासाठी भारतीय विदेशात जातात. विशेषतः, अमेरिका, इंग्लंड अशा देशांमध्ये जाण्यासाठी अनेकजण एजंटांना पैसे देतात. या एजंटना कोणतीही कायदेशीर अधिमान्यता नसते; पण परदेशात जाण्याचे आपले स्वप्न विनासायास किंवा कमीत कमी त्रासात पूर्ण व्हावे, यासाठी अशा एजंट मंडळींची मदत घेतली जाते. घर आणि शेत विकून, सर्वस्व पणाला लावून लोक या एजंटना भरमसाट पैसे देतात आणि परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अवैधपणे, कधी कधी गोठवणार्‍या थंडीत कित्येक तास ट्रकमध्ये बसून किंवा तासन्तास बर्फात चालून अमेरिकेत वा युरोपात सीमा पार करून घुसण्याचा प्रयत्न करतात. आजवर हजारो भारतीय बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले आहेत.
दुसरीकडे, यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत एकट्या अमेरिकेत 12 विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. साधारणत:, एकूण 20 लाख भारतीय विद्यार्थी विदेशात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त वास्तव्यास असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

एका कंपनीमध्ये सुमारे 30 भारतीय तरुण काम करत होते. त्यांच्यावर जाचक अटी लादून त्यांचा पगार कापण्यात येत होता. जाचाला कंटाळून तरुणांनी तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधून हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांचे मोबाईल काढून घेतले गेले. तसेच भारतीय वकिलातीकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. मोबाईलमधील सर्व तपशीलही डिलिट केला गेला. युवकांकडून 2,000 चिनी युआन खंडणी म्हणून काढून घेतले. अडकलेल्या तरुणांनी स्थानिक भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर 1 एप्रिलला सुटका केली. मात्र, अजून अनेक भारतीय तिथे फसलेले आहेत. परदेशात नोकरीसाठी जाणार्‍या तीन महिलांना नुकतीच सहार पोलिसांनी अटक केली. दलालाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडे दिली होती; पण विमानतळावर या महिलांना अडवून अटक करण्यात आली. एका प्रकरणात मुंबईतील 24 वर्षीय तरुणीला हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बहारीनला पाठवले होते, तेथे दोन-तीन महिने तिला काम दिल्यानंतर तिचा मोबाईल व पारपत्र काढून घेऊन तिला वेश्या व्यवसायात ढकलले.

अचानक मुलीचा संपर्क तुटल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिला परदेशात पाठवणार्‍या टोळक्याने तिच्या सुटकेसाठी दोन लाख रुपये मागितले. पैसे देऊन कुटुंबीयांनी मुलीची सुटका केल्यानंतर या टोळक्याने नेपाळ व भारतातून 600 मुलींना अशाप्रकारे बहारीनला वेश्या व्यवसायासाठी पाठवल्याचे उघड झाले. जरी भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे, तरी सरकारी आकड्यांनुसार केवळ 15 ते 20 टक्के तरुणांना दरवर्षी नोकर्‍या मिळतील. बाकीच्यांना दुसरे काही तरी म्हणजे उद्योगधंदा, शेती, इतर व्यवसाय स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करावे लागतात. त्यासाठी स्किल इंडियाद्वारे बहुतेक तरुणांना नवीन कौशल्ये शिकावी लागतील.

अनोळखी व्यक्तींमार्फत परदेशात नोकरीला जाणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दलालांमार्फत परदेशात नोकरीसाठी जाताना पूर्ण पडताळणी करणे आवश्यक आहे. कंपनीची माहिती, तेथे काम करणारे कर्मचारी, संबंधित देशात काम करणार्‍या परिचित व्यक्तींकडून पडताळणी करावी. परदेशात फसवणूक झाल्यास तेथील भारतीय वकिलातीशी संपर्क साधावा. परदेशात गेल्यानंतर पारपत्र व इतर महत्त्वाची कागदपत्रे अनोळखी व्यक्तीला देणे टाळावे, भारतातही अनोळखी व्यक्तीकडे कागदपत्रांच्या मूळ प्रती देऊ नयेत. त्या द्यायच्या झाल्यास पूर्ण पडताळणी करावी. सर्वात महत्त्वाचे-परदेशामध्ये प्रत्येक भारतीय वकिलातीमध्ये त्या देशात राहणार्‍या भारतीयांची नोंदणी आवश्यक आहे.

Back to top button