हे तर पूर्वनियोजित षडयंत्र, राज्यपालांविरोधात ‘निंदा व्यंजक प्रस्ताव’ मांडवा : सुषमा अंधारे | पुढारी

हे तर पूर्वनियोजित षडयंत्र, राज्यपालांविरोधात 'निंदा व्यंजक प्रस्ताव' मांडवा : सुषमा अंधारे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात विधिमंडळ सभागृहात ‘निंदा व्यंजक प्रस्ताव’ मांडला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात केली. हा योगायोग नसून सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांत माझ्यावर बरीच मुक्ताफळे उधळली गेली आहेत. विदर्भातील भावांना भेटायला आणि ओवाळण्यासाठी मी आली आहे. या शब्दांत त्यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नाव त्यांनी यावेळी आवर्जून घेतले. गोंदिया, भंडारा येथील सभा आणि पक्ष संघटनात्मक बैठकांसाठी त्या आजपासून पूर्व विदर्भात आहेत.

महापुरुषांविषयीचा अवमान हा काही निव्वळ योगायोग मला वाटत नाही असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्री मंगलप्रसाद लोढा आणि अलीकडेच आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाकडे लक्ष वेधत त्यांनी हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुनियोजित षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदींवर केलेल्या टीकेच्या संदर्भात उस्फूर्तपणे प्रतिक्रिया देणारे देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना मात्र, बराच वेळ गप्प का? असा आरोप केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यानेच उमेदवारी मागे घेण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यपाल कोश्यारी यांची गच्छंती अटळ असल्याचे दिसत असून भाजपतर्फे वातावरण निर्मिती केली जात असल्याचे टीकास्त्रही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button