Bharat Jodo Yatra : मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज माफ, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही – राहुल गांधी | पुढारी

Bharat Jodo Yatra : मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज माफ, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - राहुल गांधी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेमध्ये द्वेष, हिंसा, भीती पसरवत असून त्याच्या विरोधात ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भाजप व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण बनवत आहेत. जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. शेतकरी पहाटे ४ वाजता कामाला सुरुवात करतो, घाम गाळतो पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीकविम्यासाठी खासगी कंपन्यांना हप्ता भरतात. चक्रीवादळ, पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते. पण, नुकसाई भरपाई मिळत नाही. मोदी सरकार देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटांत माफ करते पण, शेतक-याला कर्जमाफी देत नाहीत, असा घणाघाती हल्लाबोल खासदार राहुल गांधी यांनी केला. (Bharat Jodo Yatra)

हिंगोली जिल्ह्यातील काळेगाव येथील पदयात्रेच्या सभेत हजारो लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप, आरएसएस, मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, भाजपच्या राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी होत नाहीत. यातून मिळालेला पैसा दोन चार उद्योगपतींच्या खिशात जातो. छोटे व्यापारी यांचे नुकसान झाले, हा व्यवसायच बंद करून दोन चार उद्योगपतींची एकाधिकारशाही आणण्याचा मोदींचा मनसुबा आहे. हे सरकार ‘हम दो हमारे दो’ चे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हणताच जनतेतून याला प्रतिसाद देत, ‘दो सरकार में, दो बाजार में’, असा आवाज उमटला. (Bharat Jodo Yatra)

चीनमधून वस्तू आयात केल्या जातात यातून चीनचा फायदा होतो आणि हे माल विकणारे काही उद्योगपती गडगंज होत आहेत. मोबाईल व इतर वस्तू ‘मेड इन चीन, नाही तर मेड इन हिंगोली’ अशा झाल्या पाहिजेत. मोदी सरकार हिंसा, धर्म, जात यामध्ये जनतेला गुंतवून ठेवत आहे, मुख्य मुद्यांची चर्चाच होऊ दिली जात नाही. शिक्षण, आरोग्य सर्व काही खाजगी केले, सामान्य जनतेला हे परवडणारे नाही. तुम्ही शिक्षण, आरोग्यासाठी आवाज उठवला पाहिजे. गरिबांना मोदींच्या राज्यात स्थान राहिलेले नाही. सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे, बँक, शिक्षण, हॉस्पिटल सर्व काही खाजगी उद्योगपतींच्या खिशात घातले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

दरम्यान, लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ मधीले तरुण देशासाठी मरण्यास तयार असतात. पण, येथेही मोदींनी अग्निपथ योजना आणली. जवानांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे पण मोदी सरकार फक्त सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत आहे, हे जवान आव्हानाला कसे सामोरे जाणार? जवानांना सेवेनंतर गावात सन्मान मिळत होता. १५-२० वर्ष देशासाठी दिल्यामुळे हा सन्मान मिळत असे पण अग्निपथमुळे सैन्यच कमजोर होईल. आता त्यांना या सेवेतही स्थैर्य नाही, चार वर्षानंतर घरी जा, अशी ही योजना आहे, यातून बेरोजगारी वाढवण्याचे काम होणार आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button