गो-धनाचे महत्त्व सांगणारा ‘वसुबारस’ | पुढारी

गो-धनाचे महत्त्व सांगणारा 'वसुबारस'

आश्विन वद्य द्वादशी म्हणजे वसुबारस. या दिवशी सायंकाळी गाय आणि वासराची पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दाखविला जातो. आज (शुक्रवार) वसुबारस. त्यानिमित्त…

दिवाळी किंवा दीपावली हा आपला आवडता सण शरद ऋतूच्या मध्यावर आश्विन आणि कार्तिक या महिन्यांच्या संधीकाळात दिवाळी येते. हा सण ज्या स्वरूपात साजरा केला जातो, त्याचे मूळ पौराणिक काळात आहे. कारण, दिवाळीशी निगडित दिवसांशी जोडलेला कथाभाग पुराणग्रंथामध्ये आढळतो. अल्बेरुनी या विख्यात विद्वानाने भारतास भेट दिल्यानंतर जे विवेचन नोंदवून ठेवले, त्यात दीपावली सणाचा उल्लेख आहे. म्हणजे नऊशे वर्षांहून अधिक जुन्या काळापासून दीपावली साजरी करण्याची प्रथा दिसते. वेद, उपनिषदानंतरच्या सूत्रकाळातील सामाजिक संदर्भाचा विचार करता असे दिसते की, अनेक गृह्य संस्कारांचे रूपांतर विविध भारतीय सणांमध्ये झाले. त्यानुसार पार्वण, आश्वयुनी एकत्रीकरण होऊन दीपावली प्रकाशू लागली.

दीपोत्सव म्हटल्यावर अर्थातच दिव्याला महत्त्व आहे. अस्तीच्या शुभ्र कळीचं कौतुक आहे. दीप या शब्दाची 1 व्याख्या अशी आहे, ‘दीप्सते दीपयति वा स्वं परं चेति।’ म्हणजे ‘जो स्वतः प्रकाशतो किंवा दुसऱ्याला प्रकाशित करतो, तो दीप होय. भारतीय परंपरेने दीपदान हे पुण्यकर्म ‘मानले. दिव्यांच्या इतिहासातही फार रंजक गोष्टी मिळतात. अश्मयुगात केलेला दिवा दगडात खोदून तयार केलेला होता. त्याच्या खोलगट भागात प्राणीजन्य चरबी, शेवाळे किंवा तत्सम भिजणारा पदार्थ घालून तो पेटवत असत. भारतात अग्नीचे व प्रकाशाचे ज्ञान प्राचीन काळापासून होते. पेटते अग्निकुंड हा माणसाचा आधार असे. त्यातून अग्नीला देवाचे स्थान मिळाले. अग्नीचा शोध भृगू ऋषींनी लावला असे मानले जाते. रामायण व महाभारत ग्रंथांमध्ये सोन्याचे, रत्नांचे दिवे किंवा दीपवृक्षांचा संदर्भ मिळतो. मोहेंजोदडो येथील उत्खननात टांगण्याचे दिवे मिळाले आहेत. भारतात धार्मिक व प्रादेशिक भिन्नतेनुसार व काळानुसार दिव्यांचे अनेक प्रकार आढळतात. दिवाळीत महत्त्वाचे स्थान आहे ते मातीची पणती आणि आकाशदिवा यांना. आकाशदिवा पितरांना प्रकाश देतो, असे मानले जाते. पूर्वीच्या काळीदिव्यांची वात पद्मसूत्र, दर्भगर्भसूत्र किंवा ववाख यापासून तयार केली जाई. प्राचीन काळी पार्वण किंवा पिंड नावाला

पाकयज्ञ केला जाई. पितरांच्या स्मरणासाठी यमनर्पण दीपोत्सव असे. आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस इंद्रास दूध आणि तांदळापासून केलेली खीर अर्पण केली जाई, असे वैदिक संदर्भावरून दिसते, गायबद्दलच्या आदरासाठी तुपाच्या आहुती दिल्या जात. गाय आणि तिचे वासरू यांना एकत्र ठेवले जात असे. कृषिदेवता सीतेची प्रार्थना करण्यासाठी यज्ञ केला जाई. अशा विविध मुद्दयांवरून दिवाळी हा पित्तरांप्रती आणि कृषी संस्कृतीप्रती आदर व्यक्त करण्याचा सण होता, हे स्पष्ट होते. वैदिक कृषिदेवतेची जागा पौराणिक काळात धनधान्याची देवता मानल्या गेलेल्या लक्ष्मीने घेतली. आग्रयण किंवा आग्रहायणी म्हणजे नवीन धान्याचे कौतुक करण्याचा उत्सव होता. गोधनाचे महत्त्व अधोरेखित करणारा सण होता. प्राचीन काळाचे पडसाद आजही

दिवाळीच्या सणात विखुरलेले आहेत. मात्र, आजच्या माणसाने त्यास प्रदूषण आणि कुप्रथांचे गालबोट न लावता दिवाळीला सामाजिक भान देऊन जतन करायला हवे. आकाशदिवा घरावर लखलखू लागल्यावर दिवाळीचा पहिला दिवस साजरा होतो तो वसुबारसेचा. आश्विन वद्य द्वादशी म्हणजे वसुबारस. या दिवशी सायंकाळी गाय-वासराची पूजा केली जाते.

‘तत: सर्वमये देवि सर्वदेवैः अलंकृते।

मात: मम अभिलषितं सलं कुरू नन्दिनी॥’

म्हणजे “हे सर्वात्मिक आणि सर्व देवांनी शोभित अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ पूर्ण कर.”

गोवत्सद्वादशीला काहीजण ‘नन्दिनी व्रत’ करतात. महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी होते. गायीचे, तिच्या दुधाचे महत्त्व ऋग्वेदातील ऋचांमध्ये वर्णिले गेले आहे. गायींची प्रशंसा करताना म्हटले गेले आहे की, ‘दुर्बल मनुष्याला तुम्ही पुष्ट करता. तेजहीन माणसाला तुम्ही तेज प्रदान करता. तुमचे हंबरणे मंगलमय असते. तुम्ही आमचे घरही मंगलमय करा.’ संस्कृत भाषेत मूळ धातू ‘गुप्’ म्हणजे ‘राखणे’ असा आहे. त्यावरून ‘गोप’ हा शब्द आला.

– डॉ. सुरुची पांडे 

Back to top button