Lakhimpur Kheri Violence Case : ७ नोव्हेंबरला सुनावणी, उत्तर प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या जामीन याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. पीडित कुटुंबियांकडून मिश्राच्या जामिनाला विरोध दर्शवण्यात आला आहे. प्रकरणावर ७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी घेण्यात येईल.
पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने जेष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी बाजू मांडली. मिश्रा यांच्याकडून करण्यात आलेला गुन्हा हा पुर्वनियोजित असल्याचे काही संकेत मिळाल्याचा युक्तिवाद दवे यांनी केला. या घटनेत ५ लोकांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने २६ सप्टेंबरला उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावले होते.
न्यायमूर्ती बी.आर. गवई तसेच न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचे खंडपीठ अलाहाबाद उच्च न्यायालयाने २६ जुलैला सुनावलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मिश्राच्या याचिकेवर सुनावणी घेत आहे. न्यायालयाने मिश्राची नियमित जामीन फेटाळला होता. मिश्रा गेल्या १० महिन्यांपासून तुरूंगात असून जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे यापूर्वीच नोटीस बजावले असल्याचा युक्तीवाद मिश्रा यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला. यासंबंधी उत्तर प्रदेश सरकारने अद्यापही उत्तर सादर केलेले नाही.
हेही वाचा