Womens Asia Cup T20 : हरमनप्रीत कौरने महिला T20 मध्ये रचला इतिहास, आशिया चषक जिंकून मितालीच्या विक्रमाशी केली बरोबरी | पुढारी

Womens Asia Cup T20 : हरमनप्रीत कौरने महिला T20 मध्ये रचला इतिहास, आशिया चषक जिंकून मितालीच्या विक्रमाशी केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. शनिवारी (दि. १५ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची अनुभवी खेळाडू हरमनप्रीत कौरने तिच्या नेतृत्वाखाली भारताला तिसऱ्यांदा आशिया चषक जिंकून देण्यात यशस्वी ठरली. या सामन्यात हरमनप्रीतने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Womens Asia Cup T20)

हरमनप्रीतचा हा १३७ वा टी-२० सामना होता. महिला टी-२० मध्ये सर्वाधिक सामने खेळणारी ती महिला खेळाडू ठरली. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकले. सुझीने टीं-२० मध्ये १३६ सामने खेळले आहेत. तिच्यापाठोपाठ इंग्लंडची डॅनियल यॉट तिसऱ्या स्थानावर आहे. यॉटने १३५ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली १३२ सामने चौथ्या स्थानावर असून १२७ सामन्यांसह वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन पाचव्या स्थानावर आहे. (Womens Asia Cup T20)

हरमनने केली मितालीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

हरमनने तिच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा महिला आशिया चषकमध्ये देशाला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवले आहे. या बाबतीत तिने मिताली राजशी बरोबरी केली. मितालीने २००५,२००६ आणि २००८ मध्ये कर्णधार म्हणून ही स्पर्धा जिंकली होती. हरमनने २०१२, २०१६ आणि २०२२ मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. टीम इंडियाने २००४ मध्ये ममता माबेनच्या नेतृत्वाखाली पहिला आशिया चषक जिंकला होता. तर, २०१८ साली आशिया चषक बांग्लादेशने जिंकला होता. त्यावेळी बांग्लादेशचीची कर्णधार सलमा खातून होती. भारताने आठपैकी फक्त एक आशिया कप गमावला आहे.

काय घडलं सामन्यात ?

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने नऊ गडी गमावून ६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ८.३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ७१ धावा करत, सामना आठ गडी राखून जिंकला. स्मृती मंधानाने षटकार मारून सामना संपवला. तिने २५ चेंडूत ५१ धावांची नाबाद खेळी खेळली. कर्णधार हरमनप्रीत १४ चेंडूत ११ धावा करून नाबाद राहिली. श्रीलंकेकडून कविशा दिलहरी आणि रणवीराने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताकडून गोलंदाजीत रेणुका सिंगने तीन, तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी रणवीराने श्रीलंकेसाठी सर्वाधिक १८ धावा केल्या. तिच्याशिवाय केवळ रणसिंगला दुहेरी आकडा गाठता आला, तिने संघासाठी १३ धावा केल्या.

हेही वाचा;

Back to top button