श्रीगोंदा : सहकारात विरोधाला विरोध नको: हर्षवर्धन पाटील | पुढारी

श्रीगोंदा : सहकारात विरोधाला विरोध नको: हर्षवर्धन पाटील

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा: सहकारात तसेच साखर कारखानदारीत उगाचच राजकारण करत विरोधाला विरोध करणे योग्य नाही. अशाने सहकार थांबल्याशिवाय राहणार नाही. स्व.बापूंनी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी तसेच उपेक्षित वर्गाच्या प्रगतीसाठी अहोरात्र कष्ट उपसले. तालुक्याच्या आर्थिक क्रांतीत स्व. बापूंचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे मत भाजप नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा 48 वा गळीत हंगाम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचा अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, राकेश पाचपुते, अनिल पाचपुते, प्रशांत दरेकर यांच्यासह सर्व संचालक सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटील म्हणाले, बापूंच्या निधनाला चार वर्षे झाली. मात्र, त्यांच्या स्मृती आम्ही आजही जपत आहोत. बापू गेल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत सभासदांनी दादांवर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या नेतृत्वात कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. सहकाराला राजाश्रय असल्याशिवाय सहकार चालूच शकत नाही. सहकार हा पिढ्यान्पिढ्या चालणार असून, सहकारात येणार्‍या अडचणींवर मात करत मार्ग काढून पुढे जावे लागणार आहे.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करत किमान 100 टन प्रति एकर ऊस उत्पादन केला पाहिजे. त्याच बरोबर कारखान्याने देखील आपले शेतकी खाते अद्ययावत करणे गरजेचे आहे. भाजप सरकारने शेती हिताला प्राधान्य देत अनेक धाडसी निर्णय घेतले. सहकारी क्षेत्रातील उद्योगधंद्याचे सुमारे 9 हजार कोटी रूपयांचा कर माफ केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले, नागवडे कारखाना हा सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा कारखाना असून, यावर लाखो लोकांचे संसार चालू आहेत. मात्र, काही विघ्नसंतोषी लोक कारखान्याच्या विनाकारण तक्रारी करतात. मात्र, यातून काही साध्य होत नसल्याचे सांगत नागवडे कारखाना हा राज्यात एकमेव कारखाना आहे, ज्याने सभासद संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी अनेक कारणांमुळे गाळपाच्या उद्दिष्टापर्यंत पोहचता आले नाही.

यावर्षी कारखान्याने 10 लाख गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपला कारखाना टिकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी ऊस नागवडे कारखान्याला द्यावा, असे आवाहन चेअरमन नागवडे यांनी करत, मागील वर्षीचे उर्वरित पेमेंट 15 तारखेला बँकेत वर्ग करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुभाष शिंदे यांनी केले.

Back to top button