जळगाव : 'भारतीय स्वातंत्र्याची गाथा' मधून क्रांतिकारकांचे स्मरण - जिल्हाधिकारी राऊत
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
गांधी रिसर्च फाऊंडेशन हे जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शन भरविण्यात आले. गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण या प्रदर्शनातून होत असल्याने प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही उद्घाटन करण्यात आले.
‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’प्रदर्शनाच्या उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशन सिस्टीम लि. अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, विजय मोहरील, बी. डी. पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, उदय पाटील, विराज कावडीया, अमित जगताप, राजेश नाईक, उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, नितीन चोपडा, आशिष भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. अभिजीत राऊत म्हणाले, सर्वसामान्यांना स्वातंत्र्य आणि संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्यांची वास्तविक जाणिव व्हावी जेणेकरून संविधानावर आधारित राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल; यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी योगेश संधानशिवे, अशोक चौधरी, सी. डी. पाटील, निवृत्ती वाघ यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. डाॕ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.
शाळा, महाविद्यालयांसाठी अभ्यास सहल…
महात्मा गांधी उद्यानातील प्रदर्शन सकाळी 7 ते 10 तर संध्याकाळी 5 ते 10 दरम्यान सर्वांनसाठी खुले असल्याने सर्व शाळा, महाविद्यालयांना प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. मात्र त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागणार असून अधिक माहितीसाठी निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याबाबत कळविले आहे.