Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना २१ जूनच्या रात्री केला होता फोन, चर्चा झाली पण… | पुढारी

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना २१ जूनच्या रात्री केला होता फोन, चर्चा झाली पण...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील राजकीय संकटादरम्यान (Maharashtra Political Crisis) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार वाचवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray) यांच्याशी संपर्क साधला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी २१ जून रोजीच्या रात्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून थांबवले होते, अशीही माहिती याआधी समोर आली होती.

महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या सुरुवातीला असे वृत्त समोर आले होते की उद्धव ठाकरे पद सोडण्यास तयार होते. अनेक आमदारांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांच्याकडे पर्याय उरला नव्हता. पण शरद पवार त्यांच्यामागे खंबीर उभे राहिले. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली. एकनाथ शिंदे यांच्या बंडातही काही कायदेशीर त्रुटी दिसून आल्या. यानंतर ठाकरे यांनी रणनिती बदलली. काही दिवस संकट (Maharashtra Political Crisis) टाळण्यात यश आले तर शिंदे गटात अस्वस्थता वाढू शकते, असे उद्धव ठाकरेंची रणनिती होती, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

सरकार स्थापनेसाठी भाजपकडून जोरदार हालचाली

सुत्रांच्या हवाल्याने असे वृत्त समोर आले आहे की महाराष्ट्रात भाजप ५ जुलैच्या आधी सरकार स्थापन करु शकते. त्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना २९ जून पर्यंत मुंबईत पोहोचण्यास सांगितले आहे. त्याचसोबत भाजपची सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गटाशी चर्चा सुरु असल्याचे समजते. शिंदे गटाला ६-६ कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदे दिली जाऊ शकतात. शिंदे गट आणि भाजप यांच्यातील सरकार स्थापन करण्यासाठीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेही सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, असेही समजते.

उद्धव ठाकरे यांना जे बोलायचे आहे ते खुलेआम बोलतात : शिवसेना

दरम्यान, या वृत्तावर शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला आहे. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे साहेब जे बोलायचे आहे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असे शिवसेना जनसंप्रर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button