धक्कादायक! पतीनं हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकून दिलं, महिला ब्लॉगरचा मृत्यू | पुढारी

धक्कादायक! पतीनं हात बांधून चौथ्या मजल्यावरून फेकून दिलं, महिला ब्लॉगरचा मृत्यू

आग्रा (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन; आग्रा येथील ताजगंजमध्ये एका ३० वर्षीय महिला ब्लॉगरचे हात बांधून तिला चौथ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तिचा मृत्यू झाला आहे. पतीपासून वेगळे झाल्यानंतर सदर महिला फेसबुकवरुन मैत्री झालेल्या मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होती. मृत महिलेचे नाव रितिका सिंह असे आहे. फॅशन, फूड आणि ट्रॅव्हल संदर्भात ती टिप्स देत असे. सोशल मीडियावर प्रभावशाली असलेल्या या महिलेचे इंस्टाग्रामवर ४४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नगला मेवाती परिसरात असलेल्या ओम श्री अपार्टमेंटमध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यावेळी तिची मैत्रिणही घरी होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह दोघांना अटक केली आहे. पोलिसांना प्राथमिक चौकशीत असे आढळून आले आहे की गाजियाबादमध्ये राहणाऱ्या रितिकाने २०१४ मध्ये फिरोजाबाद येथील आकाश गौतम याच्यासोबत लग्न केले होते. पण तीन वर्षानंतर तिची मैत्री फेसबुकच्या माध्यमातून फिरोजाबाद येथील विपूल अग्रवाल याच्याशी झाली.

२०१८ मध्ये ती पतीपासून वेगळे होऊन विपूल सोबत राहू लागली. हे जोडपे अडीच महिन्यापूर्वी १३ हजार रुपये भाड्याच्या ओम श्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहण्यास आले होते. शुक्रवारी रितिकाचा पती दोन महिलांसह चार लोकांना घेऊन फ्लॅटवर आला. त्याने तेथे विपूल आणि रितिकाला मारहाण केली.

विपूलने पोलिसांना सांगितले की, त्यांनी तिचे हात स्कार्फने बांधून बाथरुममध्ये बंद केले. त्यानंतर रितिकाचे हात दोरीने घट्ट बांधून तिला चौथ्या मजल्यावरुन फेकून दिले. विपूलने आरोप केला आहे की, आकाश आपल्याला ठार मारणार होता. पण आपण वॉशरुमच्या खिडकीच्या काचा तोडून शेजाऱ्यांना कळण्यासाठी ओरडू लागलो. शेजारी जमा झाल्यानंतर मारहाण करणारे दोघे पळाले. पण आकाश आणि दोन महिलांना पकडण्यात आले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button