नाशिक : जिल्ह्यात उष्णतेत वाढ; धरणांच्या साठ्यात घट | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात उष्णतेत वाढ; धरणांच्या साठ्यात घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असतानाच प्रमुख धरणांनाही त्याची झळ बसत आहे. जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये अवघा 44 टक्के साठा उपलब्ध असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एक टक्का जादा पाणी आहे. नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेल्या गंगापूर धरणात 51 टक्के साठा शिल्लक आहे.

यंदा उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. एप्रिलच्या मध्यावर पार्‍याने चाळिशी गाठल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले आहेत. परिणामी, ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ ओढवली आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष असतानाच धरणांची परिस्थिती समाधानकारक अशी नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये सध्या 28 हजार 820 दलघफू उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिककरांना पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूरमध्ये 2 हजार 854 दलघफू पाणी आहे. समूहातील चारही प्रकल्पांत एकूण 4 हजार 851 दलघफू साठा (48 टक्के) शिल्लक आहे. दारणा समूहात 9 हजार 19 दलघफू (48 टक्के) पाणी आहे. याशिवाय अन्य धरणांच्या आकडेवारीनुसार, अनेक ठिकाणी प्रकल्प क्षमतेच्या निम्म्याहून कमी साठा शिल्लक आहे. दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनचे यंदा वेळेत आगमनाचे भाकीत वर्तविले आहे. परंतु, त्याच्या आगमनाला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे धरणांतील सध्याचा उपलब्ध साठा बघता, जिल्हावासीयांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.

धरण समूहसाठा (दलघफू) टक्के :- गंगापूर 4,851 48, दारणा 9,019 48, पालखेड 2,188 26, ओझरखेड 1,281 40, गिरणा 10,425 45

धरणसाठा (दलघफू) :- गंगापूर 2,854,  दारणा 3,865,  काश्यपी 895,  गौतमी गोदावरी 820,  आळंदी 282,  पालखेड 246,  करंजवण 1,511,  वाघाड 431,  ओझरखेड 981,  पुणेगाव 169,  तिसगाव 131,  भावली 404,  मुकणे 3,588,  वालदेवी 464,  कडवा 441,  नांदूरमध्यमेश्वर 257,  भोजापूर 65,  चणकापूर 1,062,  हरणबारी 589,  केळझर 172,  नागासाक्या 27,  गिरणा 8575,  पुनद 848

हेही वाचा:

Back to top button