अजित पवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा, “अरे बाबा, भोंग्यावर भाषणं करणं सोपं आहे ; पण…” | पुढारी

अजित पवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा, "अरे बाबा, भोंग्यावर भाषणं करणं सोपं आहे ; पण..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : मशिदीच्या भोंग्यांसमोर स्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवा, असं राज ठाकरेंनी सांगताच महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यावर अनेक राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंवर चांगलीच टीका केली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘चिथावणीखोर भाषण करू लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का’, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.

शिर्डीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नुतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, “काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतात. कित्येत वर्ष लोक गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे एकमेकांना साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये, धर्मात तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं हा भोंगा लावा सांगत आहेत.”

“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा. पण आता त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगताय… सांगू लागले आहेत. कोणाला तरी बरं वाटण्यासाठी, निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं, वक्तव्यं करायची हे आपल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परडवणारं नाही”, असंही अजित पवार यांनी सांगितले.

 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले… 

अजान आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात तेढ निर्माण केली जात आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादांचं पालन करावं, विनाकारण जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करु नये. आता एक नवीन वाद, तुम्ही अजान म्हणायची मग आम्ही हनुमान चालिसा म्हणायची. अजान म्हणणाऱ्यांनी जरुर पठण करावं, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांनी ती म्हणावी; पण प्रत्येकाने आपापल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. केवळ दुसऱ्याला विरोध करण्याची भूमिका घेत जाती, धर्मात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते सर्वांसाठी अडचणीचं आहे.

हे वाचा…

Back to top button