Budget 2022 : धनाढ्यांच्या सांगण्यावरून क्रिप्टोकरेन्सीची घोषणा माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा आरोप
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील धनाढ्यांच्या सांगण्यावरूनच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी क्रिप्टोकरेंन्सीची घोषणा केली. ९९.९९% नागरिकांसाठी हे धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी व्यक्त केली. धनाढ्य अधिक श्रीमंत होत आहे. देशातील एकूण १४२ श्रीमंतांच्या संपत्तीत अनेक पटीने वाढ झाली आहे. सरकारचे एकूण उत्पन्न ४२ लाख कोटी ऐवजी या धनाढ्यांच्या संपत्तीत जवळपास ३० लाख कोटींची वाढ झाली आहे. सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी अधिकचे उत्पन्न हे श्रीमंत मिळवतील तो दिवस दूर नाही,असे देखील चिदंबरम म्हणाले.
देशाची अर्थव्यवस्था अद्यापही पूर्व स्थितीवर परतलेली नाही. गेल्या दोन वर्षात दोन लाख लोक बेरोजगार झाले आहेत. काहींनी नेहमीकरिता नोकऱ्या गमावल्या. या दोन वर्षात ८४% कुटुंबियांच्या कौटुंबिक उत्पन्नाला फटका बसला. प्रती व्यक्ती उत्पन्न वाढण्याऐवजी कमी होत आहे. जवळपास ४.६ कोटी लोकांना गरीबीच्या दरीत ढकलण्यात आले आहे. बालकांचा अभ्यास, मुलांचे कुपोषण, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताची खालावणारी क्रमवारी तसेच शहरी क्षेत्रातील बेरोजगारी दरासंबंधी देखील चिदंबरम यांनी चिंता व्यक्त केली.
पुढे बोलताना चिदंबरम म्हणाले, सरकार लोकांना मुर्ख समजत आहे. सरकारने पुढील २५ वर्षांचा उल्लेख करीत त्याला अमृत कालखंडाचे नाव दिले आहे. यावर बोलताना चिदंबरम म्हणाले की, सध्या कुठल्याही मुद्यावर ध्यान देण्याची आवश्यकता नाही, असे सरकारला वाटते. वर्तमान काळातील लोकांना अमृतकाळाचा उदय होईपर्यंत शांत बसून प्रतिक्षा करायला सरकार सांगत आहे.हे देशवासियांची विशेषत: गरीब आणि वंचितांची थट्टा असल्याचे चिदंबरम म्हणाले.
हे ही वाचलं का