कांदा कापत असताना डोळ्यात पाणी का येते?
नवी दिल्ली ः कोणत्याही भारतीय भाजीत कांद्याला महत्त्वाचे स्थान असते. मात्र, केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही कांदा गुणकारी ठरतो. विशेषतः उन्हाळ्यात कांद्याचे सेवन लाभदायक ठरत असते. कांद्याबाबतची ही काही माहिती…
कांद्यामध्ये ‘व्हिटमिन ए, बी 6, सी’ तसेच सोडियम, पोटॅशियम, लोह आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात. कांद्यामध्ये फोलिक अॅसिडही असते. पचनसंस्थेसाठी कांद्याचे सेवन लाभदायक ठरत असते. कांदा कापत असताना डोळ्यात पाणी का येते हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामागे कांद्यातील एक रसायन आहे.
कांद्यामध्ये सिन-प्रोपेनेथियल-एस-ऑक्साईड नावाचे रसायन असते. याच रसायनामुळे डोळ्यातून पाणी येते. कांदा कापत असताना त्यामधील लेक्रायमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्झाईम बाहेर निघते. ते डोळ्यातील लेक्राइमल ग्लँडला प्रभावित करू लागते आणि मग डोळ्यात पाणी येते. सिन-प्रोपेनेथियल-एस-ऑक्साईडमधील लेक्रायमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्झाईम कांदा कापत असताना हवेत मिसळते. त्यानंतर हे एन्झाईम सल्फेनिक अॅसिडमध्ये रूपांतरीत होते व त्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊन पाणी येते.