India @ 75 : ... तर राजकारणापेक्षा मानसशास्त्राचा प्राध्यापक असतो : नेताजी सुभाषचंद्र बोस
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता तारा म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. १९३३ मध्ये हिटलरने आश्चयर्यकारक यश मिळवल्यानंतर बर्लिनमध्ये किट्टी कुर्टी आणि इतर पाहुण्यांशी चर्चा करताना सुभाषबाबू म्हणाले होते, “देश परतंत्र नसता तर राजकारणापेक्षा मानसशात्राचा प्राध्यापक असतो”. त्यांच्या या विधानावरून त्यांना असणारी तत्वज्ञानाची, तर्कशास्त्राची आवड दिसून येते. त्यांच्या जाणून घेऊया सुभाषबाबूंचे जीवनाविषयक तत्वज्ञान लेखक सीतांशू दास यांच्या ‘नेताजी सुभाष’ (अनुवाद : श्रीराम पचिंद्रे) या पुस्तकाच्या संदर्भाने.
कॉलेज जीवनापासूनच काँग्रेससोबत स्वातंत्र्यलढ्यात उतरलेल्या सुभाषबाबूंच्या जीवनाविषयक दृष्टीकोनावर प्रभाव होता. तो स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा. स्वामी विवेकानंदांचा अद्वैतवादाचा सिंद्धात भारतातील वास्तववादाला नाकारत नव्हता, त्यांच्याकडे डोळेझाक करीत नव्हता. उलट सकारात्मक आणि ठोस कृतिशीलतेला तोअनुकूल होता. सुभाषबाबूंनी स्वामीजींचा हा मानवतावाद उत्कटपणे त्वरीत स्वीकारला. सुभाषबाबूंच्या जीवनविषयक तत्वज्ञानात सहज कळण्यासारखे एक सातत्य आणि सलगता आहे.
पदवी ग्रहण करताना आपल्या मित्र हेमंतकुमार सरकार यांना लिहलेल्या पत्रात सुभाषबाबू म्हणतात, “चैतन्य संप्रदायवैष्णव सिद्धांताने कोणती नवी देणगी दिली? ‘शाश्वत क्रीडा’ अर्थात ‘नित्यलीला’ निर्मिती म्हणून पाहण्याची!”
स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरल्यानंतरही आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘मला वाटतं ह्या वर्षी दुर्गापूजा थाटामाटात आणि समारंभपूर्वक साजरी झाली असेल. पण, आई खरोखरच ह्या थाटामाटाची आणि समारंभाची आवश्यकता आहे काय? आपण मनापासून दुर्गेची आळवणी करत असू तर तेवढंच तिला पुरेसं आहे. सुभाषबाबूंना देशाची स्थिती आणि जनसामान्यांबद्दलची तळमळ खूप अस्वस्थ करत असे, त्यासाठी त्यांनी आपली संस्कृती-परंपरा न टाळता त्यामध्ये एक सुवर्णमध्य साधण्याचे अनेक विचार मांडल्याचे त्यांच्या अशा पत्रांमधून दिसून येते.
मुळात परिपक्व वयात ते योगी अरविंद यांच्याकडे वळले. पण ते त्यांच्या साधनेविषयीच्या कुतुहलामुळे नव्हे तर स्वामी विवेकानंदाप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीतही ते स्थिर होते म्हणून. जेंव्हा सारा देश यातना सोसत होता तेंव्हा ते सामान्य माणसाप्रमाणे पर्णकुटीत राहू लागले होते म्हणून. यावेळी योगी अरविंद हे फ्रेंच मुलुख सोडून बोटीने पॉंडिचेरीला आले होते.
एका बाजूला भारत देशाने शरीर आणि बुद्धी या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःची हानी करून घेतली, दारुण स्थिती करून घेतली असे म्हणताना दुसरीकडे पाश्चिमात्य देशांनी अतिभौतिक आणि तथाकथित सुधारणा यांच्या मगरमिठीत तत्व आणि आत्म्याचे चैतन्य गमावल्याचे प्रतिपादन सुभाषबाबू करीत असत. म्हणूनच सुभाषबाबूंनी लिहिले आहे की, “माझ्या जीवनात विवेकानंदांनी प्रवेश केला तेव्हा माझे वय फक्त पंधरा वर्षे होते. त्या क्रांतीमुळे माझ्यातील प्रत्येक गोष्ट कमी-जास्त प्रमाणावर बदलून गेली. त्यांच्या शिकवणुकीतूनच नव्हे तर त्यांच्या छायाचित्रांमधूनही त्यांचे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व मला जाणवले. माझ्या मनात बंदिस्त असलेल्या समस्यांमुळे मी जास्त सतर्क होत गेलो, त्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा फक्त त्यांच्यापाशीच मला मिळाला”.