LSG vs MI : मुंबईचे लखनौला १८३ धावांचे आव्हान | पुढारी

LSG vs MI : मुंबईचे लखनौला १८३ धावांचे आव्हान

चेन्नई; वृत्तसंस्था : लखनौ सुपर जायंटस् विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अखेर त्यांनी निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा टोलवल्या. त्यामुळे त्यांनी लखनौपुढे विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले आहे.

फलकावर केवळ 30 धावा लागलेल्या असताना वैयक्तिक 11 धावांवर रोहितने तंबूचा रस्ता धरला. पाठोपाठ भरवशाचा इशान किशनही 15 धावा करून बाद झाला. रोहितला यश ठाकूरने तर इशानला नवीन उल हकने टिपले. त्यानंतर कॅमेरून ग्रीन (41) आणि सूर्यकुमार यादव (33) यांनी झकास फलंदाजी केली. हे दोघेही मुंबईला मोठी धावसंख्या गाठून देणार असे वाटत होते. तथापि, नवीन उल हकने पाठोपाठ या दोघांना बाद करून मुंबईला दणके दिले.

ग्रीनने 23 चेंडूंचा सामना करताना अर्धा डझन चौकार व एक षटकार ठोकला. यादवने 20 चेंडू खेळून दोन चौकार व दोन षटकार लगावले. मग, तिलक वर्मा आणि टिम डेव्हिड ही बिनीची जोडी मैदानात उतरली. मात्र, डेव्हिड फार काळ टिकू शकला नाही. वैयक्तिक 13 धावांवर तोही उंच फटका मारण्याच्या नादात बाद झाला. तिलक वर्माने 26 धावांचे योगदान दिले. त्याने दोनदा चेंडू सीमारेषेच्या पार भिरकावला. नेहल वडेराने 12 चेंडूंत नाबाद 23 धावा फटकावल्यामुळे मुबंईच्या धावसंख्येला आकार आला. त्याने दोन षटकार व तेवढेच चौकार हाणले.

लखनौकडून नवीन उल हक सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 38 धावांच्या मोबदल्यात चौघा फलंदाजांना तंबूत पाठविले. त्याला सुरेख साथ दिली ती यश ठाकूर याने. 34 धावा मोजून यशने तीन गडी टिपले. मोहसीन खान याने एक गडी बाद केला. रवी बिश्नोई याने टिच्चून मारा करून आपल्या चार षटकांत फक्त 30 धावा दिल्या. ठरावीक अंतराने मुंबईचे गडी बाद होत गेल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही.

हेही वाचा;

Back to top button