Asia Cup 2022 : ईशान, ऋतुराज, शार्दूल, सिराजचे भवितव्य अधांतरी
मुंबई ; वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरात येथे होणार्या आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात युवा फलंदाज ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. याशिवाय अष्टपैलू शार्दूल ठाकूर, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे गेले वर्षभर संघात आत-बाहेर करीत असलेल्या या युवा खेळाडूंचे टी-20 वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न अधांतरी राहू शकते.
या संघात धावांसाठी झगडणार्या विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. स्टार फलंदाज के. एल. राहुलचे 15 सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे राहुल बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भारतीय संघातील वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कप टी-20 स्पर्धेला मुकणार आहे.
आशिया कपसाठीचा भारतीय संघ : (Asia Cup 2022)
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, आवेश खान.