क्रिकेटमध्ये टीम इंडियानं पहिला विजय कधी मिळवला? जाणून घ्या ६९ वर्षांपूर्वीचा थरार
पुढारी ऑनलाईन डेस्क
टीम इंडियाविरुद्ध इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना येत्या शुक्रवारपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हे मैदान टीम इंडियासाठी खूप खास आहे. कारण टीम इंडियाने क्रिकेटच्या इतिहासातील पहला विजय फेब्रुवारी १९५२ मध्ये याच मैदानावर मिळवला होता. ६९ वर्षांपूर्वी त्यावेळच्या पाहुण्या इंग्लंडसंघाला एक डाव आणि ८ धावांनी पराभवाची धूळ चारली होती. १९५२ साली जेव्हा टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध चेन्नईच्या मैदानात (तेव्हा मद्रास म्हटलं जायचं) कसोटी सामना खेळायला उतरली होती तेव्हापर्यंत एकूण २४ सामने खेळली होती. यातील १२ सामने टीम इंडियाने गमावले होते तर १२ सामने ड्रॉ झाले होते.
टीम इंडिया क्रिकेटमध्ये आपला पहिला विजय नोंदवण्याआधी मायदेशात १२ कसोटी खेळली होती. यातील ८ सामने ड्रॉ तर ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. टीम इंडिया चेन्नईमध्ये दोन कसोटी खेळली होती आणि तिस-या कसोटीत संघाने विजय मिळवून जागतिक क्रिकेटमध्ये इतिहासात सचला.
६९ वर्षांपूर्वी इंग्लंड संघाला डाव आणि ८ धावांनी केले पराभूत…
१९५२ मध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या दौ-यावर आला होता. चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड कॅरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात २६६ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार विजय हजारे यांच्या टीम इंडियाने ९ विकेट गमावून ४५७ धावांवर डाव घोषित केला. भारताच्या डावात सलामीवीर पंकज रॉय यांनी १११* आणि पॉली उम्रिगर यांनी १३०* धावांची शानदार खेळी केली.
१९१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंड संघाचा दुसरा डावाला भारतीय गोलंदाजांनी सुरुंग लावला. दिलेलं लीड आणि त्यानंतर यजमान संघासमोर टार्गेट देण्याचा त्यांच्यावर दबाव होता. याच दरम्यान ऑफ-स्पिनर गुलाम अहमद आणि लेफ्ट-आर्म स्पिनर वीनू मांकड यांनी इंग्लिश फलंदाजांना आपल्या फिरकीने चकवा दिला. दोघा फिरकीपटूंनी ४-४ विकेट घेत इंग्लंडचा डाव १८३ धावांवर संपुष्टात आणला. याचबरोबर भारतीय संघाने डाव आणि ८ धावांनी जिंकली.
सामन्यात फक्त एकच षटकार ठोकला गेला…
या सामन्यात एकच षटकार लगावला गेला. तो षटकार भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज दत्तु फडकर यांनी लगावला. त्यांनी ६१ धावांची खेळी साकारली. दत्तु यांनी आपल्या अर्धशतकी खेळीत एकपण चौकार ठोकला नाही.
दोन्ही संघाचं कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड…
टीम इंडियाने आतापर्यंत एकूण ५४६ कसोटी सामने खेळले असून यातील १५९ सामन्यांत विजय मिळवल आहे. तर १६८ सामन्यांत पराभव पत्करावा लागला असून २१८ कसोटी सामने अनिर्णित राले आहेत.
इंग्लंड टीमने आतापर्यंत १०३० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यातील ३७६ सामन्यांत विजय आणि ३०५ सामन्यात ते पराभूत झाले आहेत. तर ३४९ सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत आणि इंग्लंड दरम्यान आतापर्यंत १२२ कसोटी सामाने झाले आहेत. टीम इंडियाने २६ आणि इंग्लंडने ४७ सामने जिंकले आहेत. ४९ सामन अनिर्णित राहिले आहेत.
सध्या कोरोना महामारी दरम्यान १० महिने आणि २६ दिवसांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. भारतात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १० मार्च २०२० ला ग्रेटर नोएडामध्ये आयरलँड आणि अफगानिस्तान यांच्यादरम्यान झाला होता. यानंतर कोरोना महामारीमुळे स्पर्धा झालेली नाही.