राऊतांचे ‘ते’ आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी फेटाळले | पुढारी

राऊतांचे ‘ते’ आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी फेटाळले

मुंबई: पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी क्षणाक्षणाला नवनविन तर्कवितर्क लावले जात असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. सुशांतचे वडील केके सिंह राजपूत यांनी दोन लग्न केल्याने सुशांतला नाराज होता असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, सुशांतच्या कुटुंबियांनी राऊतांच्या आरोप फेटाळून लावत ते खोटे माहिती देत असल्याचे म्हटले आहे. 

खासदार संजय राऊत यांनी सुशांतचे वडील केके सिंह राजपुत यांनी दुसरे लग्न केले होते, पण ते लग्न सुशांतला मान्य नव्हते असे एका लेखात म्हटले आहे. मात्र, सुशांतचे मामा आर सी सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊतांच्या आरोपाचे खंडन केले आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलेली नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले सुशांतचे मामा?

सुशांतचे वडील केके सिंह यांचे एकच लग्न झाले आहे. संजय राऊत असे विधान करत सुशांतच्या वडीलांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमध्ये राहणाऱ्या सर्वांना सत्य काय आहे ते माहिती आहे. असे चुकीचे विधान करून कुणाची बदनामी करणे हे बरोबर आहे का? असा सवालदेखील सिंह यांनी उपस्थित केला आहे.

मुखपत्र सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांनी काय म्हटले होते?

सुशांतचे संपुर्ण कुटुंब पटना येथे वास्तव्यास आहे. सुशांतचे आणि त्याचे वडिल यांच्यातील संबंध चांगले नव्हते. वडिलांनी दुसरे लग्न केले होते पण ते सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे सुशांतचा वडिलांशी भावनिक संबंध उरला नव्हता. तो किती वेळा आपल्या कुटुंबियाना भेटण्यास गेला? असा सवाल देखील राऊत यांनी आपल्या लेखात विचारला आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूमागील सत्य पुढे येऊ शकले नाही, म्हणून राजकारण केले गेले आणि हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कट रचला जात आहे. असा आरोप देखील राऊत यांनी लेखामधून केला आहे.

 

Back to top button