मुंबईच्या लोकलचा नवारंभ | पुढारी

मुंबईच्या लोकलचा नवारंभ

येत्या स्वातंत्र्य दिनापासून मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवासाची मुभा ठराविक नागरिकांना देण्यात आलेली आहे. त्याबद्दल सरकारचे आभारच मानायला हवेत. लोकल रेल्वे ही मुंबईची जीवनरेखा. मुंबईतल्या अर्थकारणाचा गाडा हाकणार्‍या श्रमजीवी कष्टकरी लोकांसाठी वाहतुकीचे तेच सर्वात मोठे साधन असून विरार, डहाणू वा कल्याण-कर्जतपासून लाखो लोक त्याच मार्गाने मुंबईत कामधंद्यासाठी पोहोचू शकतात आणि आपापल्या घरी परत जाऊ शकतात. तितक्या वेगाने अन्य कुठल्याही मार्गाने उपनगरातून मुंबईत पोहोचणे किंवा माघारी परतणे शक्य नाही.

कामधंदा किंवा अन्य कुठल्याही महत्त्वाच्या कामानिमित्त मुंबईत येऊन दिवसभरात माघारी परतण्याची तीच एकमेव सोय आहे. अजून मेट्रो सुरू व्हायची आहे किंवा त्याचे जाळे मुंबईभर विस्तारित व्हायचे आहे. शिवाय, रेल्वे सर्वात स्वस्त सुविधा आहे. म्हणून तर आपली खासगी गाडी असलेले बहुसंख्य लोकही रेल्वेनेच प्रवास करतात आणि दूर पल्ल्याचा प्रवास असेल तर बसपेक्षाही लोकल रेल्वेला प्राधान्य देतात; पण कोरोना आला आणि मुंबईच्या नाड्या त्याने लोकल बंद करून आखडून टाकल्या. मुंबई बंद करण्याचा तो सर्वात सोपा मार्ग असतो; पण त्याला आता दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला असून अजून सर्व मुंबईकरांसाठी लोकल गाड्यांची दारे खुली केलेली नाहीत. कारण, मुंबईतली सर्वाधिक गर्दी लोकलमध्येच असते आणि दिवसातल्या कुठल्याही वेळी प्रसंगी तुडुंब भरलेल्या लोकल या जणू कोरोनाला वरदानच ठरू शकतात. म्हणूनच कठोरपणे लोकल निर्बंधित ठेवल्या गेल्या.

पहिली कोरोना लाट ओसरल्यावर हळूहळू लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आणि पुन्हा गर्दीने कोरोनाला कवटाळले. म्हणूनच तडकाफडकी प्रथम लोकल सर्वांसाठी बंद करून निवडक अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच ती सेवा खुली ठेवण्यात आलेली होती. आता त्यातही सवलत देण्याचा निर्णय म्हणूनच स्वागतार्ह आहे. मागल्या दीड-दोन महिन्यांपासून विविध समाज घटक व राजकीय पक्ष संस्थांकडून तशी मागणी जोरात होत होती. आता त्याचा साकल्याने विचार करून सरकारने केवळ लस घेतलेल्यांसाठीच लोकल खुल्या करण्याचा घेतलेला निर्णय म्हणूनच सावधानतेचा उपाय म्हणून बघणे भाग आहे. ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केलेले आहेत व त्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी उलटलेला आहे, त्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे.

अर्थात, ही संख्या थोडीथोडकी नक्‍कीच नाही. दोन-अडीच कोटींची लोकसंख्या मुंबई परिसरात वास्तव्य करते आणि त्यापैकी किमान 60-70 लाख लोकांचे लसीकरण एव्हाना नक्‍की पार पडलेले असेल. म्हणूनच इतक्या मर्यादा वा अटी घातल्या तरी फटक्यात लोकल तुडुंब भरून धावण्याचा धोका नाकारता येत नाही.

थोडक्यात तितकी म्हणजे लाखोची गर्दी लोकलमध्ये घुसू लागली, तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी पायघड्याच घालणे ठरू शकते. म्हणूनच सरसकट सर्वांना किंवा अगदी लस घेतलेल्या सर्वांना लोकलने प्रवासाची मुभा देऊन टाकण्यापेक्षा त्यात केवळ अत्यावश्यक नागरिकच लोकलकडे वळतील, अशी काळजी घेण्याला पर्याय नाही. त्याच वेळी अनावश्यक लोकांनी घराबाहेर पडणे किंवा गर्दी करायला जाणे टाळण्याला प्राधान्य असलेच पाहिजे.

अर्थात, लोकल नाही तरी अन्य मार्गाने लोकांना आज प्रवास करावा लागतो आहे आणि त्यातले व्यत्यय वा विलंब यामुळेच बहुतांश लोक अनावश्यक असल्यास दूरचा प्रवास टाळत आहेत. याचा अर्थच लोकल रेल्वेसारखी वेगवान सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या संख्येने मुंबईकर अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडायचे टाळतो आहे. एकप्रकारे सरकारने प्रवासातील अडथळे वा कटकटींनाच प्रतिबंधक उपाय ठरवून निर्णय घेतलेले असतील, तर त्यामधला आशय समजून घेण्याची गरज आहे. हे निर्बंध नसते तर एव्हाना मुंबई कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाहून गेली असती, हे विसरता कामा नये. त्यामुळेच निर्बंध उठवतानादेखील सावध असण्याला पर्याय नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यदिनी दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची परवानगी देण्यातली सावधानता योग्यच म्हटली पाहिजे; पण नुसती मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली नाही तर त्यातल्या त्रुटी सांगायची स्पर्धा सुरू झाली.

दोन डोस झालेत त्यानंतर पुन्हा चौदा दिवस अधिक कशाला व्हायला हवेत? स्मार्ट फोनवरूनच पास मिळणार तर ज्यांच्यापाशी तसे फोन नाहीत त्यांचे काय? नजीकच्या केंद्रात जाऊन दोन डोस घेतल्याचे पास घ्यावे म्हणजे आणखीच कटकट, इत्यादी तक्रारी वा त्यासाठी नाराजी म्हणजे निव्वळ शहाजोगपणा आहे. सरकार तुमच्या सुविधा व सुरक्षेसाठी काही कडक निर्णय घेत असेल, तर त्यातली सुविधा बघण्यापेक्षा कल्पनेतील दुविधा शोधण्याच्या वृत्तीला दुर्बुद्धीच म्हणायला हवे! निर्बंध शिथिल करण्याची ही सुरुवात असते आणि सगळेच निर्बंध एकदम उठवले तर अराजक माजण्याचा धोका असतो. मागल्या खेपेस पहिल्या लाटेनंतर त्या धोक्याचे दुष्परिणाम संपूर्ण देशाने व मुंबई, महाराष्ट्राने चांगलेच अनुभवले आहेत. त्यातूनच हा सावधपणा मुख्यमंत्री दाखवत आहेत. त्याचे म्हणूनच स्वागत करायला हवे. जितके मिळाले तितके स्वीकारून अधिक पदरात पडण्यासाठी प्रयत्नशील असण्याला जीवन म्हणतात. तितके समजले तरी कोरोना वा त्यासारख्या महामारीवर मात करता येईल!

Back to top button