आठ वर्षांपासून मुंबईत तंबू ठोकलेले पोलीस अधिकारी बदलीच्या रडारवर! ७०० जणांची यादी तयार
मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मुंबईत आठ वर्ष पूर्ण केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली केली जाणार आहे. मुंबईत मागच्या सात वर्षांपासून काम करणाऱ्या ७२७ अधिकाऱ्यांच्या नावाची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात येत आहे.
मुंबईत मागच्या काही महिन्यांपासून पोलिसांवर गंभीर प्रकारचे आरोप झाले आहेत. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींची वसुली प्रकरणात सचिन वाझेसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. यामुळे आठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मुंबईत तैनात असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची लवकरच बदली होणार आहे.
अधिक वाचा : तुमच्या मृत्यूचा दाखला तयार आहे; जिवंत शिक्षकाला आला फोन आणि घरी रडारड…
मुंबई शहराबाहेरील पसंतीच्या तीन जागा निवडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस विभागातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटनांमुळे ही पावले उचलल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे मुंबई पोलिसांमध्ये भ्रष्टाचाराचे वाढल्याची चर्चा सुरू होती.