एअर इंडिया एक्सप्रेसची मोठी कारवाई, सामुहिक रजेवर गेलेले ३० कर्मचारी बडतर्फ | पुढारी

एअर इंडिया एक्सप्रेसची मोठी कारवाई, सामुहिक रजेवर गेलेले ३० कर्मचारी बडतर्फ

पुढारी ऑनलाईन डेस्क : एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सने सामुहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. आजरपणाच कारण देत सामुहिक रजेवर गेलेल्या ३० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बुधवारी सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी अचानक रजा घेतल्याने एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या जवळपास ३०० कर्मचाऱ्यांनी बुधवारी एकाच दिवशी आजारी पडल्याचे कारण देत सामुहिक रजा घेतली. मोबाईल फोन बंद केले, ज्यामुळे कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसने ३० केबिन क्रूंना बडतर्फ केले आहे. व्यवस्थापन आज केबिन क्रू सदस्यांसह बैठक घेण्याची शक्यता आहे. एअरलाइन ही एअर इंडियाची उपकंपनी आहे जी आता टाटा समुहाच्या मालकीची आहे. नवीन रोजगार अटींविरोधात त्यांचे कर्मचारी विरोध करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत समानतेचा अभाव असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांचा आहे.

“आमच्या केबिन क्रूच्या एका विभागाने अचानक शेवटच्या क्षणी आजारी असल्याची नोंद केली. परिणामी, विमान उड्डाणांना विलंब झाला असून ती रद्द करण्यात आली आहेत. या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी चर्चा करत आहोत. आमच्या टीम्स सक्रियपणे या समस्येकडे लक्ष देत आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत. विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर संबंधित प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत केले जातील. तसेच वेळापत्रकात बदल केला जाईल. विमानतळावर जाण्यापूर्वी विमान सेवा सुरु आहे की नाही, हे तपासावे”, असे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यानी बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.

हेही वाचा : 

Back to top button