शरद पवार उतरले PM मोदींच्या समर्थनार्थ; म्हणाले, “त्यांच्या विरोधात…” | पुढारी

शरद पवार उतरले PM मोदींच्या समर्थनार्थ; म्हणाले, "त्यांच्या विरोधात..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मालदीवच्या खासदारानेच आक्षेपार्ह सोशल मिडिया पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. “मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि इतर कोणत्याही देशातून कोणीही आपल्या पंतप्रधानांवर अशी टिप्पणी केली तर ते आम्ही खपवून घेणार नाही,” असे शरद पवार यांनी ठणकावले आहे. आज (दि.९) मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरुन मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. यानंतर पीएम मोदींनी देशवासियांना देखील लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. यानंतर मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली. यादरम्यान मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र खात्याने मालदीवच्या उच्चायुक्तांना पाचारण करून भारताची तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनार्थ आता शरद पवारही उतरले आहेत. “आपण पंतप्रधान पदाचा आदर केला पाहिजे. पंतप्रधानांच्या विरोधात देशाबाहेरील कोणाचेही खपवून घेणार नाही,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे समर्थन केले आहे.

शरद पवार यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ‘वय ८४ झाले तरी काहीजण थांबायला तयार नाहीत’ अशा शब्दात रविवारी जोरदार टीका केली होती. यावर आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. “त्यांनी काय बोलायचं याच्यासंबंधी मी फारस बोलू इच्छीत नाही. अशा प्रकारे वयाचा हिशोब करणं त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात. अशा गोष्टींबद्दल बोलणं मला आवश्यक वाटतं नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, अशा प्रकारे वयाचा हिशोब करणं योग्य नाही. माझ्या बाबतीत विचार करायचा झाला तर, मी कधी राज्याच्या विधीमंडळात तर कधी देशाच्या संसदेत अविरत काम करत आहे. या काळात कधीही माझ्या सक्षमतेबद्दल किंवा काम करण्याच्या पद्धतीबद्दल विरोधकांनी हा विषय काढला नाही. वयाचा प्रश्न असेल तर अनेक लोकांबद्दल सांगता येईल. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल बोलणं मला आवश्यक वाटत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

‘बिल्किस बानो प्रकरण महाराष्ट्र सरकाने गांभीर्याने घ्यावं’

बिल्कीस बानो प्रकरणी निर्णय देताना राजकीय हस्तक्षेप होऊ देवू नये. आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. या प्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षा माफ करण्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा गांभीर्याने विचार करणे गरजेच आहे. बिल्कीस बानोला न्याय मिळावा, असा निर्णय सरकारने घ्यावा. सामन्य माणसाला आधार मिळण्यासारखा कोर्टाने हा निर्णय घेतला आहे, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button