PM Vishwakarma Yojana : ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती | पुढारी

PM Vishwakarma Yojana : ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 17) विश्वकर्मा जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरमध्ये ‘पीएम विश्वकर्मा’ नावाच्या नवीन योजनेचा शुभारंभ करणार आहेत. 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पीएम मोदींनी घोषणा केली होती की, सोनार, सुतार, गवंडी, नाभिक या समाजांसह औजारे आणि हातांच्या सहाय्याने काम करणाऱ्या वर्गाला नवी ताकद देणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी विश्वकर्मा जयंतीला विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होईल अशी घोषणा केली होती.

यापूर्वी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही या योजनेचा उल्लेख केला होता. आता ही योजना अधिकृतपणे सुरू होणार आहे. त्यामुळे पीएम विश्वकर्मा नेमकी काय आहे? या योजनेचा उद्देश काय आहे? याचा फायदा कोणत्या वर्गाला होईल? विश्वकर्मा योजनेतून अतिमागास जातींना मदत करण्याचा प्रयत्न होईल का? 2024 च्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होईल? अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे? चला तर या योजनेबद्दल जाणून घेऊया…

पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय?

पीएम विश्वकर्मा ही पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना आधार देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत काही अटींवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. ही योजना सुरू झाल्यामुळे देशभरातील सुमारे 30 लाख विश्वकर्मा कुटुंबांना फायदा होऊ शकतो. याद्वारे पारंपरिक कलाकुसरीत गुंतलेल्या लोकांना मदत करण्यावर भर दिला जाईल. सरकारच्या म्हणण्यानुसार, कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक पाठबळ देणे असा उद्देश तर आहेच पण त्याचबरोबर त्यांच्या प्राचीन परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारसा जिवंत ठेवण्यासाठी आणि स्थानिक उत्पादने, कला-हस्तकलेच्या माध्यमातून या वर्गाची भरभराट करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

पीएम विश्वकर्मा योजनेस केंद्र सरकार 13,000 कोटी रुपयांच्या खर्चासह पूर्णपणे निधी देणार आहे. या योजनेअंतर्गत, बायोमेट्रिक आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून विश्वकर्मांची मोफत नोंदणी कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे केली जाईल. त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने एक लाख रुपये (पहिला टप्पा) आणि 2 लाख रुपयांपर्यंत मोफत कर्ज सहाय्य (दुसरा टप्पा), डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि विपणन सहय्याद्वारे मान्यता प्रदान केली जाईल.

योजनेचा उद्देश काय आहे?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य प्रदान करून देशभरातील छोट्या व्यावसायिकांची (Business) क्षमता वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमईशी जोडले जाईल, जेणेकरून त्यांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना: कोणते व्यवसाय पात्र आहेत?

पीएम विश्वकर्मा ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीर आणि शिल्पकारांना सहाय्य प्रदान करेल. या योजनेच्या अंतर्गत अठरा पारंपरिक कलाकुसरींचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी सुतार, सोनार, कुंभार, धोबी, शिंपी, चांभार, गवंडी, विणकर/चटई/झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे/बेलदार, पारंपारिक खेळणी बनविणारे, शिल्पकार/मूर्तिकार, नाभिक, हार तयार करणारे, मासेमारीचे जाळे बनवणारा, होड्या बांधणारे, चिलखत तयार करणारा, लोहार, कुलूप तयार करणारे, कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार बनविणारे आदी पात्र आहेत.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना: कागदपत्रे

आधार कार्ड, निवडणूक मतदार ओळखपत्र (Voter ID), व्यवसाय करत असल्याचा पुरावा किंवा व्यवसाय नोंदणी केलेले प्रमाणपत्र, बँकमध्ये खाते असलेला पुरावा किंवा सबसीडी पात्र कोणत्याही बँकेचे खाते, उत्पन्नाचा दाखला किंवा प्रमाणपत्र, गरज वाटल्यास जातीचे प्रमाणपत्र

पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे

कारागिरांना या योजनेमध्ये अनेक फायदे मिळणार असून पारंपरिक व्यवसायाचे जतन, कौशल्य विकासाबरोबर आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. काही महत्वपूर्ण फायदे खालीलप्रमाणे;

1. सुरुवातीस 100000 पर्यंत कर्ज 5% व्याज
2. वेळेत कर्ज फेडल्यास आणखी 200000 कर्ज 5 % व्याज
3. कौशल्य विकास प्रशिक्षण व प्रशिक्षण काळात दररोज 500 रुपये मानधन
4. व्यवसाय साहित्य खरेदीसाठी 15000 रुपये मिळणार
5. ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळणार

Back to top button