Twin Towers demolished : अखेर नाेएडातील ३२ आणि २९ मजली ‘ट्विन टॉवर’ जमीनदोस्त ( व्‍हिडिओ ) | पुढारी

Twin Towers demolished : अखेर नाेएडातील ३२ आणि २९ मजली 'ट्विन टॉवर' जमीनदोस्त ( व्‍हिडिओ )

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ‘भ्रष्‍टाचाराचा टाॅवर’ अशी ओळख बनलेल्‍या दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ३२ आणि २९ मजली ट्विन टॉवर  (Twin Towers demolished) अखेर आज (दि.२८) दुपारी २.३० वाजता अवघ्या 9 सेकंदात  जमीनदोस्‍त झाले.

Twin Towers demolished : अशी करण्‍यात आली तयारी

(Twin Tower) ४० मजल्यांच्या या दोन्ही इमारती पाडण्याची जबाबदारी एडिफिस इंजिनिअरिंग कंपनीकडे देण्यात आली होती. या जुळ्या इमारती पाडण्याची तयारी करण्यासाठी १८१ दिवस लागले. या इमारतीमध्ये ३,७०० किलो स्फोटके पेरण्यात आली होती. अत्यंत काळजीपूर्वक इमारत पाडण्यासाठी गेली १० दिवस दोन्ही इमारतींवर स्फोटके लावण्यात आले होते. एडिफिस इंजिनिअरिंग कंपनीत ४९ वर्षीय चेतन दत्ता हे ‘ब्लास्टर’ म्हणून नोकरीला आहेत. ते स्फोटक यंत्रणेचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरु होते.

एमराल्ड कोर्टाचा एक भाग असलेल्या एपेक्स (३२ मजली) आणि सेयाने (२९ मजली) हे टॉवर्स बांधकामासंबंधीच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले, त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दीर्घ कायदेशीर लढा लढला गेला. याचा निकाल भारताच्या रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या बाजूने लागला.

टॉवर ब्लास्टच्या ठिकाणावरील सकाळच्या दृश्यांमध्ये क्रेन आल्याचे दिसले, तर पोलिस सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर्सच्या आसपासचा परिसर रिकामा करण्याची घोषणा केली.  दुपारी 2.15 च्या सुमारास फक्त स्फोट होण्यापूर्वी एक्स्प्रेस वे बंद करण्‍यात आली.  स्फोटानंतर अर्ध्या तासानंतर, धूळ कमी होताच तो खुला केला जाईल. तात्काळ कमांड सेंटरमध्ये 7 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आमच्यासह येथे वाहतूक तज्ज्ञ, देखरेख सर्व गर्दीचे ठिकाण,” अशी माहिती डीसीपी राजेश एस यांनी दिली. 560 पोलीस कर्मचारी, राखीव दलाचे 100 लोक, 4 क्विक रिस्पॉन्स टीम आणि एनडीआरएफ टीम कोणत्याही अनुचित परिस्थितीचा सामना करण्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आली हाेती.

ट्विन टॉवरची मालकी कोणाकडे हाेती ?

दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवर हा सुपरटेक कंपनीची निर्मिती होती. या कंपनीच्‍या मालकांचे नाव आहे आर के अरोरा. बांधकाम, आर्थिक सल्‍लगार, शेअर विक्री आणि खरेदी, प्रिंटिग, चित्रपट निर्मिती, गृह कर्ज अशा विविध ३४ कंपन्‍यांची त्‍यांनी आजवर उभारणी केली.

मीडिया रिपोर्ट्‍स नुसार, आर. के. अरोरा यांनी आपल्‍या काही सहकार्‍यांसमवेत ७ डिसेंबर १९९५ रोजी आपल्‍या सुपरटेक कंपनीची सुरुवारत केली. नोएडा, ग्रेटर नोएडा, यमुना विकास प्राधिकरण क्षेत्र, मेरठ, दिल्‍ली-एनसीआरसह देशातील १२ शहरामंध्‍ये त्‍यांनी बांधकाम क्षेत्रात आपले प्रकल्‍प सुरु केले. काही वर्षांमध्‍ये बांधकाम क्षेत्रातील अग्रणी अशी त्‍यांच्‍या कंपनीची ओळख झाली. यानंतर त्‍यांनी विविध क्षेत्रात ३४ कंपन्‍या सुरु केला. सुपरटेक लिमिटेड कंपनी सुरुवात झाल्‍यानंतर चार वर्षांनी म्‍हणजे १९९९ मध्‍ये अरोरा यांनी पत्‍नी संगीता अरोरा यांनी सुपरटेक बिल्‍डर्स आणि एंड प्रमोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी सुरु केली होती. तसचे आपला पुत्र मोहित अरोरा यांच्‍यासह उर्जा निर्मिती, वितरणामध्‍ये त्‍यांनी काम सुरु केले.

३२ मजली इमारत कशी उभी राहिली?

दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवरच्‍या कामकाजाची सुरुवात २३ नोव्‍हेंबर २००४ रोजी झाली. नोएडा अथॉरिटीने सेक्‍टर ९३ अ स्‍थित प्‍लॉट नंबर चार ताब्‍यात घेतला. तळमजल्‍यासह एकुण ९ मजली बांधकामाला परवानगी मिळाली. दोन वर्षांनी म्‍हणजे २९ डिसेंबर २००६ रोजी नोएडा अथॉरिटीने ९ ऐवजी ११ मजली बांधकामाला परवानगी दिली. यानंतर यामध्‍ये दरवर्षी वाढ करत अखेर २६ नोव्‍हेंबर २००९ रोजी १७ मजली टॉवरच्‍या बांधकामाला मंजुरी दिली होती. यानंतर पुन्‍हा यातबदल झाला आणि २ मार्च २०१२ मध्‍ये दोन्‍ही टॉवरमध्‍ये ४०मजल्‍यापर्यंत बांधकामास परवानगी मिळाली. दोन टॉवरमधील अंतर केवळ ९ मीटर ठेवण्‍यात आले. नियमानुसार हे अंतर किमान १६ मीटर असणे आवश्‍यक होते.

बांधकामाला परवानगी मिळाल्‍यानंतर सुपरटेक कंपनीने एक टॉवरच्‍या बांधकाम ३२ मजल्‍यांपर्यंत ते दुसर्‍याचे २९ मजल्‍यांपर्यंत पूर्णही केले. यानंतर या प्रकरणी न्‍यायालयात गेले. यानंतर टॉवर उभारणी झालेला भ्रष्‍टाचार चव्‍हाट्यावर आला. अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाचा या प्रकरणाचा खटला सात वर्ष चालला, अखेर ३१ ऑगस्‍ट २०२१ रोजी उच्‍च न्‍यायालयाने कायम ठेवत टॉवर जमीनदोस्‍त करण्‍याचे आदेश दिले. तसेच टॉवर २२ मे २०२२पर्यंत जमीनदोस्‍त करा, असा आदेशही दिला. मात्र याची तयारीच अपूर्ण असल्‍याने तारीख पुन्‍हा पुढे गेली. आणि अखेर २८ ऑगस्‍ट २०२२ रोजी हे टॉवर जमीनदोस्‍त करण्‍यावर शिक्‍कामोर्तब झाले.

सुपरटेक कंपनी दिवाळखोरी कशी निघाली ?

सर्व नियमांची पायमल्‍ली करत उभारलेली सुपरटेक कंपनीचे ट्विन टॉवरची जामीनदोस्‍त करण्‍याचे आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आणि त्‍यानंतर अरोर यांच्‍या बांधकाम व्‍यवसायाची दुरावस्‍था झाली. सुमारे २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्‍प होता. यातील ७११ फ्‍लॅटचे बुकिंग झाले होते. यासाठी पैसेही घेण्‍यात आले होते. मात्र जेव्‍हा हे टॉवर जमीनदोस्‍त करण्‍याचे आदेश देण्‍यात आले. त्‍यावेळी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फ्‍लॅटधारकांना बुकिंगवेळी दिलेल्‍या रक्‍कमेच्‍या १२ टक्‍के अधिक रक्‍कम व्‍याजासह ६५२ फ्‍लॅटधारकांना देण्‍याचे आदेश दिले होते. यातील ३०० फ्‍लॅटधारांनी थेट पैसे घेतले. तर अन्‍य लोकांनी बाजारमुल्‍यांनुसार दुसर्‍या प्रोजेक्‍टमध्‍ये फ्‍लॅट घेतले.

ट्विन टॉवरमध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या ५९ गुंतवणूकदारांना अद्‍याप पैसे मिळालेले नाहीत. २५ मार्च २०२२ रोजी सुपरटेक कंपनीच दिवाळखोरी निघाली असून अद्‍याप १४ कोटी रुपये देणे बाकी आहे. कंपनीच दिवाळखोरीत निघाल्‍याने आमच्‍याकडे आता गुंतवणूकदारांना देण्‍यासाठी पैसेच नाहीत, असे कंपनीने न्‍यायालयास सांगितले. सुपरटेक कंपनीने युनियन बँकेकडून ४३२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तेही अदा न केल्‍याने या कंपनीविरोधात बँकेने याचिका दाखल केली होती.बँकेची न्‍याय बाजू मान्‍य करत न्‍यायालयाने कंपनी दिवाळखोरीत काढण्‍याची प्रक्रिया पूर्ण करा असा आदेश दिला होता.

 

 

 

Back to top button