खाद्यतेलांचे दर आणखी कडाडण्याची शक्यता | पुढारी

खाद्यतेलांचे दर आणखी कडाडण्याची शक्यता

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे जागतिक बाजारात पाम तेलाचे दर कडाडले असून याचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता असून, सूर्यफूल, सोयाबीन, राईस ब्रान, भुईमूग आदी तेलांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

मागणीइतका पाम तेलाचा पुरवठा झाला नाही तर आगामी काळात सर्वच प्रकारचे खाद्यतेल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते. त्यामुळे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने, इंडोनेशियन सरकारसोबत बोलणी करून बंदी उठविण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे सूर्यफुलाचा जागतिक पुरवठा कोलमडून पडला आहे. त्यातच आता इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली. इंडोनेशिया आणि मलेशिया हे पाम तेलाचे सर्वात दोन मोठे निर्यातदार आहेत. इंडोनेशियाच्या बंदीनंतर भारत, बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांना पामतेलासाठी मलेशियावर भिस्त ठेवावी लागणार आहे. अशा स्थितीत पाम तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भारत हा पामतेलाचा जगातला सर्वात मोठा आयातदार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांतच पामतेलाचे दर सहा टक्क्यांनी भडकले.

पाम तेलाच्या दरवाढीचा फटका संबंधित उद्योगांना बसणार आहे. रशियातील तेलबियांचे पीक संकटात आलेले आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत पाम तेलाचे दर पन्नास टक्क्यांनी वाढलेले आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता ताज्या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे.

Back to top button