यवतमाळ: वणीजवळ विशालकाय डायनासोरचे जीवाश्म सापडले | पुढारी

यवतमाळ: वणीजवळ विशालकाय डायनासोरचे जीवाश्म सापडले

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: वणी तालुक्यातील वीरकुंड गावाजवळ सहा कोटी वर्षांपूर्वीच्या लेट क्रिटाशियस काळातील विशालकाय डायनोसोर या प्राण्याचे जीवाश्म सापडले असल्याचा दावा पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.
मागील काही वर्षांपासून प्रा. सुरेश चोपणे हे या परिसरात संशोधन करीत आहेत.

या संशोधनादरम्यान, दोन वर्षांपूर्वी डायनोसोरच्या पायाचे एक अश्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसोर जीवाश्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपासून अभ्यास म्हणून सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पांढरकवडा, राळेगाव व झरी तालुक्यात ६ कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिपल्याची जीवाश्मे, तर १५० कोटी वर्षांपूर्वीची स्ट्रोमॅटोलाइटचे जीवाश्म शोधून काढले आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात २५ हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीन अवजारेसुद्धा शोधली असून, हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तिगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी पाहण्यासाठी ठेवली आहेत.

वणी तालुक्यातील बोर्डा-वीरकुंड परिसरात निओप्रोटेरोझोइक या १५० कोटी वर्षांदरम्यानच्या काळातील पैनगंगा ग्रुपचा चुनखडक असून, त्या काळात इथे समुद्र होता. जुरासिक काळात इथे विशालकाय अशा डायनासोर प्राण्यांचा विकास झाला; परंतु ६ कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशिअस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनोसोर मारले गेले. इथे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाच्या रूपाने ते पुरावे आजही पाहायला मिळतात; परंतु अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रूपांतर झाल्यामुळे आज ते सापडत आहेत.
वीरकुंड गावाजवळ ५० वर्षांपूर्वी डायनोसोरचा अश्मीभूत सांगाडा असावा; परंतु लोकांनी जंगलात शेती करताना येथील चुनखडक घरे बांधण्यासाठी वापरला.

हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनासोरची हाडेसुद्धा घरे बांधण्यासाठी वापरली. त्यामुळे येथे पुन्हा जीवाश्म आढळले नाही. ४० वर्षांपूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे याना एक जीवाश्मीकृत हाड सापडले. जीवाश्मांचा आकार, प्रकार, स्थळ आणि काळावरून तसेच भूशास्त्र विभागातील तज्ज्ञांच्या मतानुसार, हे जीवाश्म डायनासोरचेच आहे, असा विश्वास चोपणे यांनी व्यक्त केला.

देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खूप जीवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत.
चंद्रपूरप्रमाणे वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी, मुकुटबन हा परिसर जीवाश्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृद्ध आहे. या परिसरात अजून जमिनीत किंवा जंगली भागात डायनासोरची जीवाश्मे आढळू शकतात. त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्व्हे आणि संशोधन होणे गरजेचे आहे.
– प्रा सुरेश चोपणे, संशोधक

Back to top button