ठाणे : लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो पलटी, १४ जखमी
कसारा (ठाणे) ; पुढारी वृत्तसेवा : शहापूर तालुक्यातील तानसा – आटगाव रोडवर विवाहासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये अपघातात १४ वऱ्हाडी जखमी तर ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातील संदेश पवार (वय 13), अभिषेक मुकणे (वय 25), गुलाब भोये (वय 56) , संगीता भोये (वय 54), अनिता थोरात (वय 39), सरिता भवर (वय 26) , बाळू भडांगे (वय 55), मीना गावीत (वय 53), संगीता पवार (वय 38), आशिष पवार (वय 07), बाळू पवार (वय 50), मैना वाडू (वय 67), ईश्वर सहारे (वय 19), सुरेश भोये (वय 56) अशी जखमीची नावे आहेत.
नवरी मुलीच्या लग्नासाठी वऱ्हाड तानसा येथून शेजारच्याच गावात निघाले होते. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो जवळ जवळ पलटी होऊन हा अपघात झाला. या भीषण अपघातात टेम्पो मधील वऱ्हाडी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना खासगी वाहन आणि रुग्ण वाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु यामधील १४ पैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.