राणा दाम्पत्य हे पुढे केलेले प्यादे; त्यांचा प्रसिद्धीसाठी स्टंट : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा नियोजनबद्ध हा प्रयत्न आहे. राज्यात अस्थिरता, कायदा व सुव्यवस्था नसल्याचे भासवले जात आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुढे केलेले नुसते प्यादे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी राणा दाम्पत्यांचा हा स्टंट सुरू आहे. कायद्याच्या विरोधात राणा दाम्पत्यांनी वर्तन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी आज सकाळी हनुमान चालिसा वाचणार होते. परंतु आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानी रोखले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे – पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह राणा दाम्पत्यांवर निशाणा साधला.
अमोल मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा, समस्त ब्राह्मण समाजाची मागणी
वळसे – पाटील म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. परंतु काही जण राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही, हे भासविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारची प्रतिमा मलिन केल्याचा प्रयत्न सुरू आहे. कायदा व सुवस्था नाही, असे म्हणणे उचित नाही. राणा दाम्पत्यांनी हनुमान चालिसा त्यांनी स्वत:च्या घरी वाचावी. मुंबईत वाचण्याचा हट्ट कशासाठी? असा सवालही वळसे-पाटील यांनी यावेळी केला.
राज्यात जनक्षोभ तयार करून वातावरण बिघडवायचे, दंगली घडवायच्या , अस्वस्थता निर्माण करायची, अशांतता माजवायची, सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा हेतू भाजपचा आहे, असा आरोप वळसे-पाटील यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट कशासाठी ? राणा दाम्पत्यांनी असे वर्तन करायला नको होते. हिंदूत्व दोन पक्षांतील विषय आहे. यावर मी बोलणार नाही, असे वळसे पाटील म्हणाले. राज्यातील पोलिसांच्यावर मुख्यमंत्री दबाव टाकत असल्याच्या नवनीत राणांच्या आरोपावर वळसे- पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पोलिसांना आदेश देत नाहीत. कायद्याविरोधात वर्तन केल्या पोलीस योग्य ती कारवाई करतील, असेही वळसे-पाटील यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?