कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल | पुढारी

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांनंतर भरत असलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तांची मांदियाळी जमली आहे. सुमारे दोन लाखांवर भाविक शहरात दाखल झाले आहेत. भक्तिसागर 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर तसेच मठ, संस्थाने आदी भाविकांनी गजबजून गेले आहे. दर्शन रांग स्कायवॉकवरून सारडा भवनच्या पुढे गेली असून, दर्शन रांगेत 50 हजार भाविक दाखल झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद होते. त्यामुळे भाविक पंढरपुरात आले नव्हते. यात्रेची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाकडून पंढरपुरात संचारबंदी लागू करीत चैत्री, कार्तिकी, माघी व आषाढी यात्रा केवळ मोजकेच पुजारी, देवस्थान समितीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने साजरी केल्या होत्या.

शिवाय या यात्रांमध्ये भाविकांना रोखण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. वारकर्‍यांना पंढरपूरातच प्रवेश मिळाला नसल्याने वारकर्‍यांत नाराजी पसरली होती. तर गेले दोन वर्षे मंदिर बंद राहिल्याने भाविकांअभावी पंढरी नगरी सुनीसुनी भासत होती.

मात्र, घटस्थापनेला विठ्ठल मंदिर भाविकांना र्दानाकरीता खुले करण्यात आले. सद्या कार्तिकी यात्रा भविण्यात आली आहे. त्यामूळे गेल्या दोन वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनापासून वंचित राहिलेल्या भाविकांनी कार्तिकी यात्रेला हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

उद्या, (दि. 15) रोजी कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्यामूळे भाविक पंढरीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. परजिल्ह्यातून व राज्यभरातून तसेच परराज्यातून आलेल्या भाविकांनी पंढरी नगरी गजबजू लागली आहे. मंदिर परिसर भाविकांनी गजबजला आहे. तर चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी देखील भाविक पसंती देत आहेत.

भक्तीसागर 65 एकर येथे भाविकांसाठी तंबू व राहुट्या उभारून तयार करण्यात आलेल्या निवार्‍यातही भाविक भजन, किर्तन व प्रवचनात दंग झाले आहेत. येथे एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. तर शहरातील मठ, संस्थाने, धार्मिक शाळा व मंदिरातमध्ये लाखांवर भाविक वास्तव्य करीत आहे. त्यामुळे या परिसरात टाळ, मृदंगाचा आवाज कानी घुमत आहे. भाविकांना यात्रा सुरक्षित व सुलभ व्हावी, याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.

वॉटरप्रूफ दर्शन रांग

कार्तिकी यात्रेसाठी येणारे भाविक श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले असतात. भाविकांसाठी मंदिर समितीकडून स्काय वॉकच्या पुढून ते पत्राशेड येथील 10 दर्शन मंडप ते गोपाळपूर या दरम्यान वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात आलेली आहे. तर दर्शन रांगेत मॅट अंथरण्यात आले आहे. त्याचबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, सीसीटीव्ही कॅमेरे, वीज, आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

Back to top button