सोलापूर : …अन्यथा आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फोडू | पुढारी

सोलापूर : ...अन्यथा आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फोडू

भोसे (क.): पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवून नेले जात आहे. असे असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मूग गिळून गप्प बसले आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेत्यांसाठी जनतेबरोबर गद्दारी करत आहेत. त्यांनी या उजनी पाणी आंदोलनात सहभाग न घेतल्यास त्यांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फोडण्याचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा, उजनी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी दिला.

उजनी धरणातील पाणी लाकडी – निंबोळी सिंचन योजनेद्वारे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील गावांना देण्यात येणार आहे. त्यास सरकारची प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. ही सिंचन योजना सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करणारी असल्याने सरकारने ही योजना मागे घ्यावी, यासाठी पंढरपूर – टेंभुर्णी महामार्गावर भोसे चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खुपसे-पाटील बोलत होते.

लाकडी-निंबोळी सिंचन योजना रद्द करावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आल्याने सुमारे 2 तासांहून अधिक काळ पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

या आंदोलनात उजनी धरण संघर्ष समितीचे माऊली हळणवर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, मोहोळ शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, लक्ष्मण धनवडे, बळीराजाचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रणजित बागल, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज गावंधरे, नितीन बागल, स्वाभिमानीचे रायाप्पा हळणवर, समविचारी आघाडीचे बाळासाहेब माळी, महादेव तळेकर, अजय जाधव, शहाजहान शेख उपस्थित होते.

या रास्ता रोको आंदोलनासाठी मारुती कोरके, मोहन तळेकर, संजय तळेकर, नितीन खटके, महेश खटके, गणेश सरडे, सज्जन भोसले, यांच्यासह विविध पक्षांचे नेते, शेतकरी संघटनेचे नेते, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणी चोरीच्या विरोधात लढा 

उजनी पाण्याचा हा लढा धनगर समाज तसेच पालकमंत्र्यांच्या विरोधात नाही, तर आपला लढा हा पाणी चोरीच्या विरोधात आहे. सोलापूर जिल्हावासीयांवर वाईट वेळ आणलेले घड्याळ फोडण्याची वेळ आता आली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणातील सगळे पाणी बारामतीला नेले आहे आणि आता उजनी धरणातील पाणी पळवले जात असल्याचा आरोप अतुल खुपसे-पाटील यांनी केला.

Back to top button