वाढत्या वयातील लग्न; गर्भधारणेत येतेय विघ्न: बदलत्या जीवनशैलीचा परिणाम | पुढारी

वाढत्या वयातील लग्न; गर्भधारणेत येतेय विघ्न: बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

सातारा : मीना शिंदे :  बदलत्या जीवनशैलीमध्ये लग्नाचे वय वाढू लागले आहे. शिक्षण करिअरला प्राधान्य देत आर्थिक स्थिरस्थावर झाल्यावर लग्नाचा विचार होवू लागल्याने पुढील सर्वच गोष्टींना उशीर होत आहे. अनेक जोडप्यांमध्ये पालकत्वाची जबाबदारीही पुढे ढकलली जात आहे. अनेक महिलांमध्ये पस्तीशीनंतर गर्भधारणा होत असून सुलभ बाळंतपणासह अनेक बाबतीत गुंतागुंत वाढत आहे. त्यामुळे वाढत्या वयातील गर्भधारणा धोक्याची ठरत आहे. तीसीच्या आतच सुलभ पालकत्व स्वीकारण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून जात आहे.

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहेच; पण सर्वात पुढे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही करावे लागत आहेत. आई- वडिलांच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दिवसेंदिवस राहणीमानाचा दर्जा सुधारू लागला आहे. युवा पीढीच्या आयुष्याची व्याख्याही बदलू लागली आहे. मुलं- मुलींमधून करिअरला प्राधान्य दिले जात आहे. शिक्षण व करिअरला प्राधान्य दिले जावू लागल्याने लग्नाचे वय वाढू लागले आहे. नोकरी व्यावसायामध्ये स्थिर स्थावर झाल्यावर लग्नाचा विचार होवू लागला आहे. त्यामुळे उशिरा करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

साधारणपणे तिसीनंतर लग्न आणि पस्तीशीनंतर पालकत्व हा फंडाच युवा पिडीकडून अवलंबला जात आहे. वैवाहिक जीवनाचा आनंद घेत पालकत्व स्वीकारण्याची मानसिकता तयार होवून प्रत्यक्ष गर्भधारणेपर्यंत चाळीशी येत आहे. वय वाढल्याने वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वंशवेलीतील सातत्य राखने हे विवाहसंस्थेचा मूळ उद्देश आहे. वाढत्या वयातील लग्नामुळे या उद्देशालाच सुरुंग लागत आहे. पस्तीशीनंतर गर्भधारणेत अनेक विघ्न येत आहेत.

मुदतपूर्व बाळंतपण, सिझेरियन, बाळात व्यंगत्वासह अन्य गंभीर स्वरुपाचे आजार समोर येत आहेत. समस्या टाळण्यासाठी योग्य वयात लग्न आणि योग्य वयातच पालक होणे आवश्यक आहे. पस्तीशीनंतर गर्भधारणा झाल्यास सुलभ बाळंतपणासह अनेक बाबतीत गुंतागुंत वाढत आहे. त्यामुळे वाढत्या वयातील गर्भधारणा धोक्याची ठरत आहे. योग्य वयात सुलभ पालकत्व स्वीकारण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

प्रीप्लॅन पालकत्वामुळे वेळेआधीच प्रसुती

सध्याची पिढी करिअरला प्राधान्य देणारी आहे. उच्च शिक्षण होवून नोकरीत स्थिर स्थावर होईपर्यंत तिशी उलटते. लग्नानंतर एकमेकांचे करिअर व सोयीने पालकत्व स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी होण्यासाठी वेळ घेतला जातो. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्वही प्लॅन केले जाते. मात्र यामध्ये वय वाढल्याने उच्चरक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार आदि आजारांची सुरुवात होते. त्यामुळे गर्भधारणेत अडथळे येतातच पण वेळेआधी प्रसुती होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

असे आहेत उशीरा गर्भधारणेतील धोके..

धकाधकीच्या युगात ताण-तणावामुळे पस्तीशीनंतरच विविध आजार उद्भवत आहेत. उशीरा मातृत्वामुळे गर्भधारण होणे व ती टिकूण राहणेही आवघड होते. मधुमेह असताना गर्भधारणा झाल्यास वेळेआधीच प्रसुती किंवा कमी वजनाचे बाळ जन्मन्यास धोका असतो.
वाढत्या वयामध्ये गर्भधारणा झाल्यास झटके येणे, लीव्हरवर सूज येणे, किडणीचे आजार होण्याची शक्यता बळावते. हर्मोनल बदलामुळे गर्भधारणा होण्यात अडचणी येवून वंध्यत्वाचा धोकाही बळावतो.

सुलभ मातृत्वासाठी वय वर्षे २१ ते ३० दम्यान वर्षांच्या गर्भधारणेसाठी योग्य वय आहे. वयाच्या या टप्प्यामध्ये शारिरीक तंदुरुस्तीबरोबरच स्नायूंची लवचिकता चांगली असते. त्यामुळे सुलभ प्रसुतीला प्राधान्य मिळते. तिशीच्या आत पहिले मुल व पस्तीशीच्या आत दुसरे मुल होणे मातांसाठी सुरक्षीत आहे. योग्य वयात लग्न व योग्य वयातच मुल होणे आवश्यक आहे.
-डॉ. स्मीता कासार, स्त्रीरोग तज्ञ

Back to top button