दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सोप्या होणार | पुढारी

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सोप्या होणार

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शालेय परीक्षांची मूल्यमापन पद्धती बदलण्यावर भर देण्यात आला आहे. तासंतास शिकवणी, पाठांतरावर आधारित परीक्षा बंद होऊन आता दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सोप्या होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. तसेच काही विषयांच्या प्रश्नपत्रिका बहुपर्यायी प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न अशा दोन प्रकारच्या असतील. तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळा आणि परीक्षा मंडळ अशा दोन स्तरावर करण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेचा पर्याय उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्याची इच्छा असल्यास असे विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेनुसार पुन्हा परीक्षेला सामोरे जाऊन अधिक गुण मिळवू शकतात. ही योजना सीबीएसई आणि आयसीएसई तसेच इतर शिक्षण मंडळांमध्ये नाही, मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात श्रेणीसुधार योजनेचीदेखील शिफारस करण्यात आली आहे. बोर्डाच्या परीक्षेत चांगली प्रगती करण्यासाठी विद्यार्थी कुठल्याही शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा देऊ शकतील. यातील एक परीक्षा मुख्य परीक्षा असणार असून इच्छा असल्यास विद्यार्थी श्रेणी अथवा गुण सुधारण्यासाठी दुसरी परीक्षा देऊ शकतात. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एसएससी बोर्ड) ही एक स्वायत्त
संस्था आहे. या संस्थेचे कर्मचारयांच्या वेतनासह सर्व कामकाज खर्च हा शाळांचे नोंदणी शुल्क, परीक्षा फी यातून भागविला जातो. त्यामुळे अशी संस्था बंद करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात परीक्षा आणि मूल्यमापनाविषयी ज्या शिफारशी देण्यात आल्या आहेत, त्या देशातील सर्व राज्य आणि शिक्षण मंडळांनी आपापल्या स्तरावर राबवायच्या आहेत. या धोरणात दहावी, बारावी परीक्षाच रद्द करण्याची शिफारस केली असून परीक्षा विद्यार्थीस्नेही, कौशल्यांवर आधारित तसेच विद्यार्थ्यांची शिकवणी आणि पाठांतर तपासण्यापेक्षा क्षमता तपासतील अशा पद्धतीने परीक्षेची रूपरेखा आखण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकाची नव्याने रचना. प्रगतिपुस्तक सर्वकष, चतुरस्र, बहुआयामी अहवाल देणारे असावे. विद्यार्थ्यांचे बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक क्षेत्रातील वेगळेपण सांगणारे प्रगतिपुस्तक असावे. ठरावीक अभ्यासक्रमानंतर लगेचच चाचणी परीक्षा, त्यामुळे माध्यमिक स्तरावर परीक्षेचे दडपण नसावे. पायाभूत अध्ययन निष्- पत्तीचे परीक्षण करण्यासाठी इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी. शिक्षकांसाठी प्रज्ञावान मुलांचे शिक्षण या विषयाचा शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात समावेश करावा. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या राष्ट्रीय निवासी उन्हाळी कार्यशाळा घेण्यात याव्यात. देशभर विविध विषयांत ऑलिम्पियाड स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. व्यापक सहभागासाठी ग्रामीण आणि प्रादेशिक भाषेत परीक्षा घेण्यात याव्यात अशा प्रकारच्या शिफारशी परीक्षा आणि मूल्यमापनासंदर्भात करण्यात आल्या आहेत.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेचा पर्याय उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्याची इच्छा असल्यास असे विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेनुसार पुन्हा परीक्षेला सामोरे जाऊन अधिक गुण मिळवू शकतात.
  •  बोर्डाच्या परीक्षेत चांगली प्रगती करण्यासाठी विद्यार्थी कुठल्याही शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा देऊ शकतील. यातील एक परीक्षा मुख्य परीक्षा असणार असून इच्छा असल्यास विद्यार्थी श्रेणी अथवा गुण सुधारण्यासाठी दुसरी परीक्षा देऊ शकतात.

Back to top button