LokSabha Elections | पहिले क्रीडा विद्यापीठही सत्ताधार्‍यांमुळे रखडले : सुनील केदार यांचा आरोप | पुढारी

LokSabha Elections | पहिले क्रीडा विद्यापीठही सत्ताधार्‍यांमुळे रखडले : सुनील केदार यांचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी मी प्रयत्न केले. सर्व मान्यता घेऊन केवळ वर्ग सुरू करणे बाकी असताना राज्यातील सरकार बदलले आणि क्रीडा विद्यापीठाचा प्रवास थांबला. हे क्रीडा विद्यापीठ रखडण्यास केवळ ससत्ताधारी जबाबदार आहेत, असा आरोप माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व इंडिया फ्रं टचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केदार बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.

केदार म्हणाले, मी क्रीडामंत्री असताना बालेवाडीतील क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील असतानाही मी पुण्यात क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी माझ्यावर आरोप झाले. यूजीसीकडून मास्टर्स, डीग्री कोर्सेस मंजूर करून आणले. यावर तज्ज्ञांची नियुक्ती केली. इमारती आणि पायाभुत सुविधा बालेवाडीत असल्याने केवळ वर्ग सुरू होणे बाकी होते. असे असताना राज्यातील सरकार बदलले. तेव्हापासून आजपर्यंत या विद्यापीठाची फाईल कुठे अडकली, काहीच माहिती नाही. विकासाच्या गप्पा मारणार्‍या भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विद्यापीठाला खोडा घालण्याचे काम केले आहे. नवीन पिढीचे नुकसान झाले.

माझ्याकडे क्रीडा विभागासह पशुसंवर्धन विभागही होता. शेळीपालन व मेंढीपालन उद्योगाला प्रोत्साहन दिले. दमास्कसच्या शेळीची ब—ीड येथे क्रॉस ब्रीड करण्यासाठी परवानगी घेतली. नागपूरच्या प्रयोगशाळेत तसे प्रयोगही करण्यात आला. परंतु, आमचे सरकार गेले. हे दोन्ही प्रकल्प बाजूला सारण्यात आले. यामुळे युवकांची, क्रीडा आणि शेतकर्‍यांची फार मोठी हानी झाली. विकासाचे हे निर्णय बाजूला का ठेवले? याचे स्पष्टीकरण पालकमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशी मागणी केदार यांनी केली.

हेही वाचा

Back to top button