राज्यातील 140 कारखान्यांची धुराडी बंद | पुढारी

राज्यातील 140 कारखान्यांची धुराडी बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात 140 साखर कारखान्यांची धुराडी कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे बंद झाली असून, अद्यापही 67 कारखाने सुरू आहेत. सद्य:स्थितीत 10 कोटी 49 लाख टन उसाचे गाळप पूर्ण होऊन 10.23 टक्के सरासरी उतार्‍यानुसार राज्यात 107.31 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आले आहे. दरम्यान, राज्यात कोल्हापूर विभागाने ऊस गाळप, साखर उत्पादन आणि साखर उतार्‍यातील आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे.

कोल्हापूर विभागाने 239.5 पूर्ण केले आहे, तर सर्वाधिक 11.55 टक्के उतार्‍यानुसार 276.7 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. या विभागातील 40 पैकी 26 कारखाने बंद झाले आहेत. दुसर्‍या क्रमांकावर पुणे विभाग असून, येथील कारखान्यांनी 231.8 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, तर 10.46 टक्के उतार्‍यानुसार 242.43 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. या विभागातील 31 पैकी 18 कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झालेला आहे. सोलापूर विभागातील ऊस गाळप हंगाम येत्या आठवड्यात संपुष्टात येण्याची अपेक्षा आहे.

या विभागात 213.87 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे, तर 9.38 टक्के उतार्‍यानुसार 200.69 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. सर्वाधिक 50 कारखाने सोलापूर विभागात असून, येथील 43 कारखाने बंद झालेले आहेत. प्रमुख ऊस गाळपात अहमदनगर विभागाने 136.86 लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागाने 96.84 लाख टन आणि नांदेड विभागात 116.88 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे.

  • 107 लाख टन साखर उत्पादन तयार
  • 67 कारखाने सुरूच
  • ऊस गाळप, साखर
  • उत्पादन, उतार्‍यात कोल्हापूर विभाग अग्रस्थानी

हेही वाचा

Back to top button