सरपंच-ग्रामसेवक वादाचा गावविकासावर परिणाम; राज्यभरातील चित्र | पुढारी

सरपंच-ग्रामसेवक वादाचा गावविकासावर परिणाम; राज्यभरातील चित्र

संतोष वळसे पाटील

मंचर : राज्यभरातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेले कारभारी गावचा कारभार पाहू लागले आहेत. ग्रामसेवकांना असणार्‍या कामाचा व्याप व ते काम नियमांच्या चौकटीत बसले पाहिजे ही असणारी समज यामुळे त्या कामाला होत. असलेला विलंब यामुळे सध्या काही गावांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांमध्ये खटके उडत असल्याचेही पाहावयास मिळत आहे. याचा परिणाम ग्रामविकासावर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य याची गटविकास अधिकारी यांनी एकत्र कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच आणि सदस्य या सगळ्यांनी एकत्र एक विचाराने नियोजनबद्ध काम केले तरच गावचा विकास होईल अन्यथा विकासकामांमध्ये अडथळेच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातील अनेक गावांच्या ग्रामपंचायत निवडणूक नुकत्याच पार पडल्या आहेत. या गावांमध्ये नवीन गाव कारभारी पाहावयास मिळत आहेत. निवडणुका पार पडल्यानंतर नवीन गाव कारभारी सरपंच व सदस्य हे गावात ज्यावेळेस कार्यरत होतात, त्यावेळेस कामाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर असतो. तोच उत्साह सध्या अनेक ठिकाणी पाहावयास मिळत असून, लोकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास, आपल्यावर टाकलेले जबाबदारी समर्थपणे पार पाडायची या उद्देशाने हे सर्वच लोक चांगल्या पद्धतीने व वेगात काम करण्याकडे यांचा कल आहे. एखादी तक्रार किंवा समस्या आली की तिचे निराकरण झाले पाहिजे, लोकांचे काम झालं पाहिजे आणि ते ताबडतोब झालं पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.

परंतु हे होत असताना या कामांची कायदेशीर व कागदोपत्री नियमानुसार करण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते आणि त्यामुळे कामांना उशीर होतो. एखादे काम पूर्ण करत असताना सगळ्या गोष्टीची पूर्तता होणे हे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक कामांना ग्रामसेवक लगेच परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे ग्रामसेवकांना असणार्‍या अनेक जबाबदार्‍या पाहता अनेक वेळा ते पंचायत समितीच्या ठिकाणीही बैठकीसाठी असतात. त्याचप्रमाणे विविध कामांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी देखील त्यांना पंचायत समितीमध्ये जावे लागते. अनेक कामांचा आढावा घेण्यासाठी ते पंचायत समितीमध्ये उपस्थित असतात. त्यामुळे अनेक वेळा ग्रामसेवक हे तालुक्याचे ठिकाणी दिसून येतात. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असल्याने एकच ग्रामसेवकाला दोन गावांची जबाबदारी पार पाडावी लागते.

सध्या अनेक ग्रामसेवकांवर दोन गावांच्या जबाबदारी आहेत. त्यामुळे त्यांना दोन-दोन गावांमध्ये वेळ द्यावा लागतो. अनेक गोष्टींची माहिती ही वरिष्ठ कार्यालयांना पुरवावी लागते. माहिती अधिकारचे अर्ज, ग्रामस्थांची जुनी कागदपत्रे मागणीचे अर्ज यामध्येही मोठ्या प्रमाणावर ग्रामसेवकांचा वेळ जात असतो. त्यामुळे अनेक कागदपत्रांची पूर्तता करून त्या कामाला सुरुवात करण्यासाठी ग्रामसेवकांचा वेळ जातो.
परिणामी, लोकांच्या समस्या सुटत नाही आणि सरपंच नाराज होतात. अशी परिस्थिती सध्या अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यातूनच ग्रामसेवक-सरपंच यांच्यात खटके उडत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरीतच अतिरिक्त कारभार असणार्‍या ग्रामसेवकांना एकच गावात ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा

Back to top button