पुणे : परताव्याच्या आमिषाने 14 कोटींची फसवणूक | पुढारी

पुणे : परताव्याच्या आमिषाने 14 कोटींची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेती फर्मच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत तब्बल 24 नागरिकांना 13 कोटी 82 लाख 87 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हर्टिकल फार्मिंगच्या माध्यमातून हळदीचे उत्पादन घेण्यासाठी प्रकल्प उभारणीसाठी गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी, चतुःशृंगी पोलिसांनी प्रशांत झाडे (रा. अंबरनाथ ठाणे), रोहन मताले, संदेश गणपत खामकर (रा. नाशिक), जयंत रामचंद्र बांदेकर (रा. वेस्ट मुंबई), कमलेश महादेवराव ओझे, ए. एस. अ‍ॅग्री अँड अक्वा एलएलपी या कंपनीतील इतर व्यक्ती यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंध अधिनियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका 63 वर्षीय व्यवसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना फर्मचे बाणेर येथील कार्यालयात 2019 नंतर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे अकोला येथील असून, ते शेती व व्यापार करतात. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीच्या ए. एस. अ‍ॅग्री आणि अक्वा या फर्मची माहिती मिळाली.

शंभर एकराचे उत्पादन एका एकरात काढतो…

फिर्यादींनी गुंतवणूक करावी म्हणून आरोपींनी आमची फर्म व्हर्टिकल फार्मिंगमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे, असे सांगितले. या तंत्रज्ञानाचे आमच्याकडे पेटंट आहे. शंभर एकरात जेवढे हळदीचे उत्पादन निघते तेवढे आम्ही एका एकरात काढतो. या योजनेत गुंतवणूकदाराने स्वतःची जमीन फर्मला प्रकल्प उभारण्यासाठी फर्मला द्यायची.

त्यावर प्रकल्प उभारण्यासाठी स्वतःची रक्कम गुंतवायची. त्यानंतर त्या जमिनीवर फर्म व्हर्टिकल फार्मिंगचे प्रकल्प उभारून हळदीचे उत्पादन घेणार, ते उत्पादन फर्म स्वतः खरेदी करणार, केलेल्या गुंतवणुकीवर फर्म दरमहा परतावा देईल. योजनेचा कालावधी सहा वर्षाचा राहील. रोख रकमेतील निव्वळ गुंतवणूक व प्रकल्पातील गुंतवणूक असे पर्याय दिले.

Back to top button