बारामती तालुक्यातील निरा नदीच्या पाण्यात माशांची तडफड सुरूच | पुढारी

बारामती तालुक्यातील निरा नदीच्या पाण्यात माशांची तडफड सुरूच

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील होळ येथे निरा नदीचे पाणी दूषित झाल्याने नदीतील लाखो माशांची जीव वाचविण्यासाठी तडफड सुरू आहे. पश्चिम बाजूला नदीमध्ये स्वच्छ पाणी असल्याने तिकडे मासे धाव घेत आहेत. परंतु, दूषित पाण्याने माशांचा मोठ्या प्रमाणावर जीव जात असून, नदीलगत मृत माशांचा खच पडू लागला आहे. निरेच्या प्रदूषणाबाबत सगळेच कारखाने, कंपन्या कानावर हात ठेवत असल्याने या प्रदूषणाला नेमके जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

होळ येथे निरा नदीचे दृश्य पाहिले, तर एकीकडे स्वच्छ पाणी, तर दुसरीकडे कमालीचे दूषित पाणी, असा विरोधाभास दिसून येत आहे. होळच्या बंधार्‍याच्या वरील बाजूस मुरमाचा बंधारा आहे. तिकडील पाणी स्वच्छ तर होळ, कोर्‍हाळे खुर्द बाजूकडील पाणी कमालीचे अस्वच्छ व दूषित आहे.

या भागाचा खालचा भाग म्हणजे कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, निरावागज हा आहे. या भागातील दूषित पाण्याबाबत कायम फलटण तालुक्यातील कत्तलखाने, दूध कंपन्यांकडे बोट दाखविले जाते. परंतु, आता वरच्या भागातील होळ परिसरातील या स्थितीला नेमके कोणती कंपनी, कारखाने जबाबदार आहेत, असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ना पाहणी, ना उपाययोजना
निरेतील दूषित पाण्यामुळे लाखो माशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे अस्वस्थता आहे. परंतु, याकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेला लक्ष द्यायला वेळ नसल्याची स्थिती बारामती तालुक्यात पाहायला मिळते आहे. येथे दूषित पाण्याने जे मासे तडफडत आहेत, त्यांचा जीव वाचणे सहजशक्य आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. सरकारी पातळीवरून सूत्रे हलणे आवश्यक आहे. फक्त दूषित पाण्यात सध्या ग्लानीत असलेले व तडफडत असलेले मासे क्रेटमध्ये अथवा अन्य साधनांमध्ये भरून ते स्वच्छ पाणी असलेल्या भागात सोडणे गरजेचे आहे. ते झाले तर यातील लाखो माशांचा जीव वाचू शकेल.

दोन्ही तालुक्यांत मासे खाण्याची स्पर्धा
निरा नदीच्या पाण्यावर तरंगणारे मासे मोठ्या प्रमाणात रविवारी व सोमवारी नागरिकांना मिळाले. फलटण तालुक्यात सुमारे दोन ते तीन टन मासे रिचवले गेले. बारामती तालुक्यातही मोठ्या प्रमाणात येथील मासे पकडून त्याची विक्री करण्यात आली. या माशांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने मासे पकडणार्‍यांची चंगळ झाली आहे. निरेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर माशांचा खच पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Back to top button