भोसरी: पावसाच्या हजेरीने नागरिकांची तारांबळ
भोसरी, पुढारी वृत्तसेवा: भोसरी परिसरात दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तसेच चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती. भोसरी परिसरात सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले. अवघ्या काही वेळात मुसळधार पावसाच्या धारा बरसल्या.
भोसरी परिसरात काही दिवस पावसाने विश्रांती घेतली असल्याचे चित्र होते. परंतु सोमवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली होती. अचानक पाऊस आल्याने कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मिळेल त्या ठिकाणी आडोशाने नागरिक उभे होते . अवघ्या काही वेळात पावसाने रस्ते सुनसान झाले. दुपारपासून सर्वत्र उष्णतेने तापलेले वातावरण मात्र या पावसाने गार झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
परिसरात पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले असलयाचे चित्र भोसरी परिसरात आहे. पावसाचा पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबके तयार झाली होती. या पाण्यामध्ये मच्छरांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
भोसरी परिसरात पडणार्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. शाळेतील विद्यार्थी, चाकरमानी तसेच नागरिकांना पडणार्या पावसाने धांदल उडाली असल्याचे चित्र भोसरी परिसरात पाहवयास मिळत होते. काही ठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहनचालकांची वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती.