पुणे : पाण्याची चिंता मिटली; धरणसाखळीत वर्षभर पुरेल एवढा जलसाठा | पुढारी

पुणे : पाण्याची चिंता मिटली; धरणसाखळीत वर्षभर पुरेल एवढा जलसाठा

पुणे : मागील दहा ते पंधरा दिवसांत पडलेल्या पावसामुळे पुणे शहराच्या वर्षभराच्या पाणी पुरवठ्याची चिंता जवळजवळ मिटली आहे. खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सायंकाळपर्यंत साडेअठरा टीएमसीच्या पुढे पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला वर्षाला साधारणपणे अठरा ते वीस टीएमसी इतक्या पाण्याची गरज असते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांतील एकूण पाणीसाठा हा अडीच टीएमसीच्या खाली होता.

त्यामुळे महापालिकेला शहरात पाणीकपात सुरू करावी लागली होती. पाणीकपातीचा निर्णय झाल्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडल्याने पंधरा दिवसांत चारही धरणांतील पाणीसाठा साडेअठरा टीएमसीपर्यंत पोचला आहे. एकूण पाणीसाठ्याची टक्केवारी 64 टक्क्यांपर्यंत गेल्याने शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

यंदा अधिक पाणीसाठा
या धरणांतील एकूण साठ्याचा विचार करता, गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.85 टीएमसी जास्त पाणी जमा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 9.73 टीएमसी इतका होता. खडकवासला धरण हे शंभर टक्के भरल्याने या धरणातून मुठा नदीत सुमारे 3.19 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले आहे.

चार धरणांतील पाणीसाठा
खडकवासला : 1.97 टीएमसी (100 टक्के)
पानशेत : 7.04 टीएमसी (67.14 टक्के)
वरसगांव : 7.67 टीएमसी (59.82 टक्के)
टेमघर : 1.89 टीएमसी (50.99 टक्के)
एकूण साठा : 18.58 टीएमसी (63.73 टक्के.)

Back to top button