संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्यांची प्रकरणे बाहेर काढली तर...
नाशिक : पुढारी ऑनलाईन ; माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र बाजूला करा आणि मग बघा, आम्ही पण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. त्यांची प्रकरणे बाहेर काढली तर, ते ५० वर्षे सुटणार नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेना खासदार संजय राउत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केली. नारायण राणे यांनी एका कार्यक्रमात संजय राउत यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी हिंमत असेल तर करून दाखवा असे आव्हान दिले.
दरम्यान संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यानच ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने हा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर राउत यांनी कोण पदाधिकारी तुम्हाला त्यांची नावे माहिती आहेत का? असा उलट प्रश्न विचारला. ज्यांची नावे मला माहिती नाहित, नाशिककरांना माहिती नाहीत अशी दोन-चार मेंढरे इकडे-तिकडे गेली असतील असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
नाशिकमध्ये शिवसेना आणि शिवसैनिक जागेवरच आहेत. शिंदे गटाकडून मेंढर पकडायची आणि घेवून जायची एवढच काम सुरू असल्याचा टोला लगावला. यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाला कोणताही फटका बसणार नाही असे राऊत म्हणाले.
आज पत्रकार दिनावर बोलताना, समाजात बदल घडवण्याची खरी ताकद पत्रकारांमध्ये आहे. पत्रकारीतेत बदल होत गेले. प्रिंट मीडियासोबतच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे युग आले आहे. सध्याच्या घडीला पत्रकारीतेला तितकेच महत्वाचे असल्याचे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :