सप्तशृंगगडावरील तारेने जखमी असलेल्या 'त्या' वानराला तारेल का वनविभाग?
सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे ; परिसरात वानरांचा मुक्त संचार असून, ते भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरत असतात. अशाच एका वानराच्या हाताला तारेने जखम झाली असून, हाताला तार बांधलेल्या अवस्थेत हे वानर भटकंती करीत आहे. त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.
तीर्थक्षेत्र सप्तशृंगगडावर गावाच्या चोहोबाजूंनी वनविभागाचे जंगल आहे. शिवालय तलावाजवळ सतीच्या कडा परिसरात वानरांचा मोठा वावर असतो. तेथील माकडांना भाविक चणे, काकडी, फुटाणे, केळी असे अन्नपदार्थ देऊन सेल्फीचा आनंद घेतात. यातील एका वानराच्या हाताला तार बांधलेली आढळली असून, या तारेमुळे वानराच्या हाताला जखम झाली आहे. काही भाविकांच्या ही बाब लक्षात आली. मात्र, या वानरावर वनविभागाने अद्यापही उपचार केलेले नाहीत. त्यामुळे वानराच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने बघ्याची भूमिका घेतल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे.
वानराचा हात लोखंडी तारेने जखमी असूनही त्याकडे वनविभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. गावाच्या चोहोबाजूंनी जंगल असून, वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. शासनाने विविध योजना मंजूर करून लाखो रुपयांचा निधी दिला. मात्र, त्याचा वन्यप्राण्यांना काही उपयोग होत नाही.
– गणेश बर्डे, माजी ग्रा. पं. सदस्य, सप्तशृंगगड
गावाच्या चोहोबाजूंनी वनविभागाने मागील वर्षी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 5 ते 6 वनतळे बांधली, पण त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार असून, त्यात पाण्याचा थेंबही नाही. मग या तळ्यांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.